कोपरगाव, दि. 5 (प्रतिनिधी)- दिवसेंदिवस हवामानात होणारे बदल, अवर्षण परिस्थिती आणि पाण्याचा ताण यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हुमणी किड प्रार्दुभावामुळे मोठे आर्थिक नुकसान होते ते टाळण्यासाठी सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांने याबाबतचा तौलनिक अभ्यास करून सभासद शेतकऱ्यांना त्यावरील एकात्मीक उपाययोजनेसाठी प्रवृत्त करून प्रकाश सापळे देण्याचा धडक कार्यक्रम हाती घेतल्याचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सांगितले.
रविवारी (दि.5) कारखाना कार्यस्थळावर हुमणी किडीचा प्रार्दुभाव रोखण्यांसाठी माफक किंमतीत ऊस उत्पादक सभासद शंकर परजणे (संवत्सर), रविंद्र देशमुख (दहेगांव), सोपान आगवण (करंजी), संदिप गुरूळे (मुर्शतपुर), तात्यासाहेब देवकर (टाकळी), प्रकाश गोर्डे (वारी) सचिन औताडे (पोहेगांव) आदिंना प्रकाश सापळे वितरीत करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजीमंत्री शंकरराव कोल्हे होते. प्रारंभी कार्यकारी संचालक जीवाजीराव मोहिते, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी गेल्या वर्षी कारखाना व वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट संस्थेच्या सहकार्याने हुमणी किड नियंत्रणासाठी राबविलेल्या उपाय योजनांची माहिती दिली. ऊस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर यांनी जुन 2019 मध्ये पहिला पाऊस पडण्याच्या आधी ऊस शेतात प्रकाश सापळा लावला तर पहिल्या पावसानंतर जमीनीतून निघणारे हुमणी किडीचे भूंगेरे या प्रकाश सापळयाकडे आकर्षित होवुन किडीचे नियंत्रण कशा पध्दतींने करावयाचे याबाबतचे मार्गदर्शन दिले.
कोल्हे म्हणाले, प्रभावी उपाययोजना न केल्यास हुमणी किडीच्या प्रार्दुभावामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे 80 ते 100 टक्के नुकसान होते. एैनवेळी यावर काय उपाययोजना करायच्या याबाबत शेतकरी द्विधा मनस्थितीत असतात तेंव्हा कारखान्यांने याबाबत अगोदरच काळजी घेवुन ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना संपुर्ण मार्गदर्शन ऊस विकास व शेतकी विभागामार्फत उपलब्ध करून दिले असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावे असे आवाहन केले.