ढिसाळ कामांमुळे केळवडेत वाहनांच्या रांगा
कापूरहोळ – पुणे-सातारा महामार्ग परिसरात शनिवारी (दि. 20) झालेल्या मुसळधार पावसामुळे केळवडे गावच्या डोंगरावरुन आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे महामार्गाला दुपारी पुराचे स्वरूप आले होते. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागला.
केळवडे (ता. भोर) येथे शनिवारी झालेल्या जोरदार पावसाने महामार्गालगतच्या डोंगरावरुन आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने महामार्गाचा मुख्य रस्ता व सेवा रस्ता पाण्याखाली गेला होता. मातीचा राडारोडा रस्त्यावर आल्यामुळे प्रवाशांची त्यातून वाट काढताना चांगलीच तारांबळ उडाली. अनेक प्रवाशांना महामार्ग प्रधिकरणाच्या ढिसाळ नियोजनाचा अनुभव आला. पावसाळ्यापूर्वीची कामे न झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले असतानाही प्रवासी जीव मुठीत धरुन वाहने पुढे नेताना दिसत होती.
राष्ट्रीय महामार्ग क 4 वरील भोर तालुक्यातील भौगोलिक परिस्थितीचा परिपूर्ण अभ्यास न करता घाईघाईने ठेकेदाराचे हित जोपासत चुकीच्या पद्धतीने रस्त्याचे काम केले आहे. रस्ता रुंदीकरणामुळे गेली अनेक वर्ष स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या आंदोलनाला प्रशासनाने केराची टोपली दाखवून ठेकेदाराचे हित जोपासले असल्याचा आरोप केला जात आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणा आणि नियोजन नसल्याचा फटका नेहमी प्रवाशांना बसत आहे. रस्त्याकडेला गटारांची योग्य व्यवस्था नसल्याने ही स्थिती निर्माण झाली असल्याचे मैत्री प्रतिष्ठनचे अध्यक्ष चंदू परदेशी यांनी सांगितले.