पाटणा -बिहार आणि आसाम या राज्यांना पुराने मोठा तडाखा दिला आहे. त्या नैसर्गिक आपत्तीमुळे दोन्ही राज्यांमध्ये मिळूून आतापर्यंत 139 जण मृत्युमुखी पडले आहेत. तर 1 कोटीहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत.
बिहारच्या 12 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे 66 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. बिहारमध्ये मागील चोवीस तासांत पुराने आणखी 14 जणांचा बळी घेतला. त्यामुळे त्या राज्यातील मृतांची संख्या 92 इतकी झाली आहे. त्या राज्यात शर्थीने मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान, आसामच्या 33 पैकी 27 जिल्ह्यांमध्ये पूूरस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे 48 लाख लोक प्रभावित झाले आहेत. त्या राज्यात आतापर्यंत 47 जण मृत्युमुखी पडले आहेत. गंभीर पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आसाममधील भाजप खासदारांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्या शिष्टमंडळाने आसामसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी त्या भेटीत केली. मोदींनी त्या शिष्टमंडळाला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.