1996 मध्ये राज्यात भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीने 48 पैकी 33 जागा मिळवत कॉंग्रेसचा धुव्वा उडवला. त्यावेळी कॉंग्रेसची राज्यातील सूत्रे शरद पवार यांच्याकडे होती. 1996 मध्ये रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट-तट एकत्र आले होते आणि त्यांनी स्वतंत्ररित्या उमेदवार उभे केले होते. त्यावेळच्या निवडणुकीपर्यंत रिपब्लिकन पक्षाला मानणारी मते कॉंग्रेसलाच मिळायची. मात्र या पक्षाचे प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, रा.सु. गवई, जोगेंद्र कवाडे आदी नेते मंडळी एकसंघ रिपब्लिकन पक्ष तयार करण्याच्या उद्देशाने एकत्र आले.
यामुळे 1996 मध्ये आंबेडकरी जनतेने कॉंग्रेसपासून फारकत घेतली. त्याचा फायदा भाजप शिवसेना युतीला झाला. 1998 मध्ये शरद पवार यांनी रिपब्लिकन पक्षाचे सर्व गटतट कॉंग्रेसच्या बाजूला आणले. त्यांच्यासाठी जागा सोडल्या. त्याचबरोबर मुलायमसिंगांच्या समाजवादी पक्षालाही कॉंग्रेसबरोबर घेतले. त्यामुळे 1998 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला 38, तर युतीला अवघ्या 10 जागा मिळाल्या.