टोकनद्वारे दिली जाते पाच ते दहा दिवसांनंतरची वेळ
जिल्हा प्रशासनाच्या आधार केंद्रचालकांना सूचना
आधार नोंदणीसाठी नागरिक आल्यानंतर त्यांना आठ दिवसांपेक्षा अधिक दिवसांचे टोकन देऊ नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने आधार केंद्र चालकांना दिल्या आहेत. जर एका केंद्रांवर आधार नोंदणीसाठी आठ दिवसांपेक्षा जास्त वेळ लागणार असेल तर संबंधित केंद्रचालकांनी नागरिकांना दुसऱ्या केंद्रांवर जाण्याचा सल्ला द्यावा. जवळचे केंद्र कुठे आहे, याचेही मागर्दशन केंद्र चालकांनी करावे, अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाने आधार केंद्रचालकांना दिल्या आहेत. जेणेकरून नागरिकांना आधार नोंदणी अथवा दुरुस्तीसाठी जास्त दिवस वाट पहावी लागणार नाही.
पुणे –आधार कार्ड नोंदणी तसेच आधारमधील दुरुस्तीसाठी आधार केंद्रांवर अजूनही रांगा लावाव्या लागत आहे. तसेच, आधारसाठी गेल्यावर लगेच नोंदणी होत नसून नागरिकांना आधी टोकन दिले जाते. त्यानंतर सुमारे पाच ते दहा दिवसांनी आधार केंद्राची वेळ निश्चित होते. जिल्ह्यात आधार केंद्रांची संख्या कमी असल्याने नागरिकांना आधारसाठी वेटिंगवर राहावे लागत आहे.
पंतप्रधान विमा योजना, गॅस सिलेंडरचे अनुदान, रेशनकार्ड, विविध प्रकारच्या शिष्यवृती, रोजगार हमी योजना आदी प्रकारच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. योजनांचा लाभ घेण्याची अंतिम मुदत जवळ आली असल्याने केंद्रांत रांगा लागल्या आहेत. बॅंक खाते, गॅसचे अनुदान, मोबाइल क्रमांक, पॅन कार्ड आदींसह विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. याचबरोबर नावातील बदल, आधार कार्डमधील चुका, जन्मतारीख आदींमध्ये बदल करण्यासाठीही नागरिकांची मोठी गर्दी होते.
अपुऱ्या मशीनच्या संख्येमुळे आधार नोंदणी केंद्रांवर नागरिकांची गर्दी वाढत होती. त्यातच आधार केंद्र कुठे सुरू आहेत. याची माहिती नसल्याने काही आधार केंद्रांवर आधार नोंदणी अथवा दुरुस्तीचे टोकन घेण्यासाठी केंद्रांवर सकाळपासूनच रांगा लागत आहेत. तसेच, दिवसभरात फक्त 50 टोकण देण्यात येत असल्याने नागरिकांना आधारसाठी पुढील आठवड्यातील वेळ मिळत आहे.