लाखणगाव – पोंदेवाडी येथे झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरावरील पत्रे व लोंखडी खांब पडल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पारगाव शिंगवे येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
येथील शेतकरी ज्ञानेश्वर नारायण पोंदे यांच्या घराचे व गोठ्याचे छप्पर वाऱ्यामुळे उडून गेले आहे. तसेच संसारोपयोगी वस्तूंचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घरावरील पत्रे, लोखंडी खांब उखडुन पडल्याने सुनंदा ज्ञानेश्वर पोंदे (वय 40), ज्ञानेश्वर नारायण पोंदे (वय 45), सीताबाई नारायण पोंदे (वय 65), आदेश ज्ञानेश्वर पोंदे (वय 14, ऐश्वर्या मंचरे (वय 20) जखमी झाले आहेत. या घटनेचा पंचनामा करुन पोंदे कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य रविंद्र करंजखेले यांनी प्रशासनाकडे केली आहे.