पुणे – जिल्ह्यातील दुष्काळाची भीषणता दिवसेंदिवस वाढत असून, मान्सूनचे आगमनही अद्याप झाले नाही. त्यामुळे तब्बल पावणेपाच लाख नागरिकांची तहान भागविण्यासाठी दररोज 272 टॅंकर दिवस-रात्र धावत आहेत. तरीही काही वाड्या-वस्त्यांवर टॅंकर पोहोचत नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
जिल्ह्यात मागील आठ दिवसांत टॅंकरची संख्या 20 ने वाढली आहे. त्यामध्ये सर्वाधिक बाधित लोकसंख्या इंदापूर तालुक्यात असून 91 हजार नागरिकांची तहान भागविण्यासाठी 46 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तर, बारामतीमध्ये
41 टॅंकरद्वारे 74 हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे. पुरंदर तालुक्यात 47 हजार लोकसंख्या दररोज पाण्यासाठी वणवण फिरत असून, त्याठिकाणी 30 टॅंकर सुरू आहेत. शिरूरमध्ये 52 हजार लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी 29 टॅंकर सुरू आहेत. त्याचबरोबर दौंड, जुन्नर या तालुक्यातही बाधित लोकसंख्या 40 हजाराच्या पुढे आहे.
मागील दोन दिवसांत जिल्ह्यात वळिवाचा पाऊस पडला. मात्र, हा पाऊस कमी आणि वादळ अधिक असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच अडखळत पाऊस झाला तर पाण्याचा प्रश्न कसा सुटणार. कारण, जिल्ह्यातील बहुतांश पाणी साठे संपत आले आहेत. त्यामुळे जून महिन्यात किमान पिण्यासाठीतरी पाणी मिळावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, जोपर्यंत जिल्ह्यात पुरेशा पाऊस होत नाही, पाणीसाठ्यात वाढ होणार नाही, तोपर्यंत टॅंकर सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.