पुणे – जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाच्या वाढत्या चटक्यामुळे पाण्याचे स्रोतही आटत चालले असून नवीन स्रोत शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाची धावपळ सुरू आहे. आत्तापर्यंत तालुकानिहाय काही पर्यायी पाण्याचे स्रोत शोधण्यात आले आहेत. पावसाळ्यापर्यंत हे स्रोत टिकविणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. पावसाळा लांबला तर पाण्यासाठी होणारी वणवण अधिक वाढेल, प्रसंगी पाण्यावाचून जीव गमवावा लागेल अशी परिस्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 130 गावे आणि 1 हजार 11 वाड्या-वस्त्यांवरील 33 हजार 523 नागरिकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात पाण्याचे वेगवेगळे स्रोत आहे. बोअर, विहीर या स्रोतातूनच नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. सद्यस्थितीत आंबेगाव तालुक्यात पारगांव येथील एक खासगी विहीर आणि अवसरी, कळंब याठिकाणी उद्भवाचे ठिकाण उपलब्ध आहे. बारामतीमध्ये सुपा येथील चांदगंडेवाडी आणि कदम बोअर. भोरमध्ये भटघर धरण. दौंड येथे खासगी विहीर, बोरमलनाथ मंदिर, वरवंड तलाव आणि हिंगणगाडा तलाव. हवेलीमधील हडपसर येथे खासगी विहीर, कल्याण खामगाव मावळ, कोंढणपूर, मांडवी. इंदापूर येथे बाबुळगांवची विहीर, सरडेवाडी, लोणीदेवकर येथील खासगी विहीर आणि सिनार मास येथे उद्भवण्याचे ठिकाण आहे.
जुन्नर तालुक्यात बोरी बुद्रुक येथील खासगी विहीर, कांदळी, मंगरूळ, खडकुंब, जुन्नर, उदापूर, मांदारणे, सीतेवाडी येथे स्त्रोत आहेत. खेडमध्ये रेटवडी आणि बीबी येथे खाजगी विहीर. मावळमध्ये पाण्याची स्थिती चांगली आहे. मुळशीमध्ये मुळशी धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. पुरंदरमध्ये मोरगाव प्रादेशिक योजनेचे जॅकवेल नाझरे धरण, धरणाखालील शासकीय विंधन विहीर. शिरूर येथे आमदाबाद, पिंपळे जगताप, करंदी, पिंपळे धमाळ, मुंखई, कवठेयमाई, कासारी, न्हावरे, निमोणे आणि पिंपळसुटी येथे स्त्रोत आहेत. तर वेल्ह्यासाठी गुंजवणी स्रोत धरणाचा आहे. त्यामध्ये बारामती, आंबेगाव, हवेली, दौंड, जुन्नर, पुरंदर आणि शिरूर तालुक्यातील पाण्याचे स्रोत संपत आले आहेत. त्यामुळे पर्यायी स्रोत शोधण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.