पुणे – पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये अल्कॅान सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेमध्ये तिघे गंभीर जखमी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेबाबत देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या दुर्घटनेमध्ये दोषी असणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी अल्कॅान सोसायटी उभारणाऱ्या अल्कॅान लँडमार्क्स व कांचन या दोन रजिस्टर्ड संस्थांमधील भागीदार व बांधकाय व्यावसायिकांच्या नावे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जगदीशप्रसाद तिलकचंद अगरवाल, सचिन जगदीशप्रसाद अगरवाल, राजेश जगदीशप्रसाद अगरवाल, विवेक सुनील अगरवाल, विपुल सुनील अगरवाल, पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मिकांत गांधी व त्यांच्या संस्थेमध्ये काम करणारे अभियंता, ठेकेदार यांच्यावर भारतीय दंड विधान ३०४, ३४ कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.