कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे ः कामात कुचराई केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे
कोल्हापूर – बोगस बियाणे आणि खते पुरवून शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा. त्यांना काळ्या यादीत टाका. या कामात कुचराई केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिला. येथील शासकीय विश्रामगृहात राजर्षी शाहू सभागृहात कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांची कृषी विषयक योजनांची सविस्तर आढावा बैठक कृषीमंत्री डॉ. बोंडे यांनी आज घेतली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते.
विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांभाळे यांनी संगणकीय सादरीकरण करून विविध योजनांची माहिती दिली. बोंडे म्हणाले, जिल्ह्यातील जमिनींची प्रत टिकवून ठेवण्यासाठी मृद संधारणाचे काम हाती घ्यावे. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, साखर आयुक्तालय, साखर कारखाने या सर्वांनी एकत्र येवून मृद संधारणाचा आराखडा तयार करावा. यामध्ये 100 टक्के ठिबकवर शेती, शेतीचा फेरपालट, जमिनीत कर्ब कायम ठेवण्यासाठी उपाययोजनांचा समावेश करा. हा आराखडा कृषी मंत्रालयाला सादर करा.
विषमुक्त अन्न निर्माण करण्याच शासनाच धोरण आहे. त्यासाठी जे शेतकरी सेंद्रीय पध्दतीत शेती करतील अशांना निश्चितपणे शासन पाठबळ देणार आहे. शेतकऱ्यांना बोगस बियाणे आणि खते पुरवणाऱ्या कंपन्यांविरोधात जे शेतकरी ग्राहक न्यायालयात गेले आहेत अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने पाठपुरावा करावा, असे निर्देश त्यांनी दिले.