कोलकता: लोकसभा निवडणूक संपल्यानंतरही तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपमधील राजकीय संघर्ष कायम असल्याचे चित्र आहे. त्यातून आमच्याशी टक्कर घेणारे उद्धवस्त होतील, असा इशारा तृणमूलच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.
ईदनिमित्त नमाज पठण करण्यासाठी जमलेल्या मुस्लिम बांधवांशी ममतांनी बुधवारी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपचा उल्लेख टाळून त्या पक्षावर शरसंधान केले. जो हमसे टकराएगा; वो चूर चूर हो जाएगा ही आमची घोषणा आहे. हिंदू त्यागासाठी, मुस्लिम प्रामाणिकपणासाठी, ख्रिश्चन प्रेमासाठी तर शीख बलिदानासाठी ओळखले जातात. आमच्या प्रिय हिंदुस्थानचे आम्ही रक्षण करू.
घाबरण्याचे काहीच कारण नाही. जितक्या वेगाने ते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) बळकावतील; तितक्याच वेगाने ते गायबही होतील, असे त्या म्हणाल्या. ममता सातत्याने ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित करत आहेत. ईव्हीएममध्ये छेडछाड करून भाजप यश मिळवत असल्याच्या आशयाचा आरोप त्यांनी लावून धरला आहे.