सतराव्या लोकसभा निवडणुकांसाठीची मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण सात टप्प्यांत हा मतदानाचा सोहळा पार पडणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान नुकतेच पार पडले. यामध्ये 20 राज्यांमधील 91 जागांसाठी मतदान झाले. या 91 जागा लढणाऱ्या उमेदवारांमध्ये 17 टक्के उमेदवारांवर विविध गुन्ह्यांचे आरोप आहेत. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी दिलेल्या शपथपत्राच्या आधारे ही गोष्ट समोर आली आहे. याखेरीज अन्यही काही बाबींचा हा वेध.
या उमेदवारांमध्ये 239 उमेदवार पदव्युत्तर पदवी घेतलेले म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएट आहेत; तर पदवीधर उमेदवारांची संख्या 201 इतकी आहे. पदविका असणाऱ्यांची संख्या 150 आहे, तर 161 उमेदवार 12 वी पास आहेत. सर्वाधिक संख्या 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांची आहे. हा आकडा 240 इतका आहे. उर्वरितांमध्ये 65 उमेदवार आठवी पास, 60 उमेदवार पाचवी पास आहेत. याखेरीज 66 निरक्षर उमेदवारांनीही खासदारकीसाठीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरलेला आहे.
जवळपास सर्वच राजकीय पक्ष संसदेत महिलांना 33 टक्के आरक्षणाच्या बाजूने असल्याचा दावा करताना दिसतात. मात्र उमेदवारी देताना त्यांच्याकडून अशी विभागणी केली जात नाही. पहिल्या टप्प्यातील एकूण उमेदवारांमध्ये महिला उमेदवारांची संख्या 89 आहे; तर पुरुष उमेदवारांची संख्या आहे 1177. याचाच अर्थ महिलांना केवळ 7.56 टक्केच संधी देण्यात आली आहे.
शपथपत्रातील माहितीच्या आधारे उमेदवारांची घोषित संपत्तीही समोर येत असते. त्यानुसार या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांमध्ये 159 उमेदवार करोडपती आहेत. पक्षनिहाय विचार करता यामध्ये कॉंग्रेस अव्वल स्थानी आहे. त्यानंतर भाजपा आणि टीडीपीचा क्रमांक लागतो. कॉंग्रेसचे 69 उमेदवार (83 टक्के), भाजपाचे 65 (78 टक्के) उमेदवार कोट्यधीश आहेत. टीडीपी या पक्षाचे 100 टक्के म्हणजे सर्वच्या सर्व उमेदवार कोट्यधीश असल्याचे दिसून आले आहे.
आता कलंकित उमेदवारांची आकडेवारी पाहूया. या 91 जागांसाठी रिंगणात असणाऱ्या उमेदवारांमध्ये कॉंग्रेसच्या 83 पैकी 35 आणि भाजपाच्या 83 पैकी 30 उमेदवारांवर गुन्हेगारीचे खटले दाखल झालेले आहेत. कॉंग्रेसचे 42 टक्के उमेदवार कलंकित आहेत. त्यापैकी 27 टक्के खटले हे गंभीर स्वरूपाचे आहेत. भाजपाचे 36 टक्के उमेदवार कलंकित असून त्यातील 19 टक्के उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत.