कोपरगाव – सुमारे 15 वर्षांपासून अवसायनातील बाळासाहेब सातभाई मर्चंट बॅंकेत पतसंस्थांच्या 10 कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. या ठेवी परत मिळण्याकरिता पतसंस्थांचे प्रतिनिधी सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर आजपासून बेमुदत उपोषणास बसले आहेत.
जोपर्यंत प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत माघार नाही, असा निर्धार पतसंस्थांचे प्रतिनिधी डॉ. के. वाय. गाडेकर, राजेंद्र वाबळे, साहेबराव निधाने यांनी व्यक्त केला आहे.
पंधरा वर्षांपासून अवसायनात असलेल्या बाळासाहेब सातभाई मर्चंटस को. ऑप. बॅंकेत कोपरगाव व राहाता तालुक्यांतील सुमारे 35 पतसंस्थांच्या दहा कोटी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. त्यामुळे हजारो ठेवीदारांसह पतसंस्था अडचणीत आलेल्या आहेत.
अवसायनाचे कामकाज चालू असून, डीआयसीजीसी ऍक्ट व सहकार कायद्याप्रमाणे काम चालू आहे, असे सांगून वेळोवेळी पतसस्थांची बोळवण केली जाते. कायद्याप्रमाणे अवसायनाची मुदत 10 वर्षे असते. ती संपूनही पतसंस्थांच्या ठेवी परत मिळालेल्या नाहीत. हा कालावधी मार्च 2020 ला संपेल.
आजही बॅंकेचा ताळेबंद शून्य करण्याच्या अनुषंगाने कामकाजाची परिस्थिती नाही. त्यामुळे पतसंस्थांच्या अडकलेल्या ठेवी व्याजासह परत मिळाव्यात, यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. संबंधित अधिकारी प्रतिसाद न देता उपोषण मागे घ्यावे, म्हणून दडपण आणीत आहेत, असे पतसंस्थांचे प्रतिनिधी डॉ. के.वाय. गाडेकर, राजेंद्र वाबळे, साहेबराव निधाने, ज्ञानेश्वर गायकवाड, राजेंद्र शिंदे यांनी सांगितले आहे.