मृगाच्या चांगल्या सुरुवातीचा आनंद ठरला क्षणिक
लोणी काळभोर – मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच म्हणजे 7 जूनला वरूणराजाचे हलके आगमन झाल्याने सर्वांनाच सु:खद धक्का बसला; परंतु त्यानंतर त्याने दडी मारली. त्यामुळे यावर्षी वर्तविण्यात आलेल्या अंदाजांना काहिशी बगल देत पाऊस लांबल्याने बळीराजा चिंतातूर झाला असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
एकीकडे मशागतीची सर्व कामे पूर्ण झाली असली, तरी पेरणीयोग्य पावसाची अद्याप प्रतिक्षा आहे. 25 मे रोजी रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर वळवाचा पाऊस पडेल ही अपेक्षा सर्वांनाच होती; परंतु रोहिणी नक्षत्र सालाबादप्रमाणे कोरडे ठणठणीत गेले. यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज असल्याने व मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. अनेक वर्षांनतर यावर्षी मृग नक्षत्रातच पेरणी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. शेतकऱ्यांनीही मशागतीची कामे वेगाने केली. उसनवारी करून खते, बियाण्यांचे नियोजनही केले. शेतकरी पेरणीच्या तयारीत असतानाच अचानक पावसाने दडी मारली. यानंतर आज येईल, उद्या येईल असे करता-करता बरेच दिवस उलटले.
शेतकरी यावर्षी निसर्ग आपल्याला साथ देईल म्हणून रखरखत्या उन्हात शेतीच्या मशागतीचे काम करू लागला आहे. गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांना अनेक समस्या सहन कराव्या लागत होत्या. उन्हाळी हंगामात घेतलेले रबी पिकेही जमीनदोस्त होत आहेत. शेतकऱ्यांना निसर्गही साथ देत नसून शासनही वेळोवेळी मदत करीत नाही. अशा परिस्थितीत कुणाकडून दाद मागावी अशा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पुढे ठाकला आहे. अनेक गावांमध्ये पावसाळ्यात प्रामुख्याने बाजरीचे पीक घेतले जाते. जून महिन्यात पाऊस पडल्यानंतर बाजरीची पेरणी करतात. यंदा मात्र पावसाने दडी मारल्याने बाजरीची अजिबात पेरणी झालेली नाही.
खरिपासाठी शेतकऱ्यांची तयारी
मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. यावर्षी लवकर पेरणी करायची या आशेने अनेक शेतकऱ्यांनी बियाणे, खताची खरेदी केली. खरेदीत आलेली तेजी पाहता विक्रेत्यांनीही थोड्या फार फरकाने जादा दर आकारत पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला. पावसाचे वातावरण पाहून शेतकऱ्यांनाही घासघीस न करता बियाणे, खत खरेदी केली. यातून अनेक शेतकऱ्यांना जादा पैसे मोजावे लागले.
अशुद्ध, घाण पाण्याने तारले
दीड महिन्यापूर्वी नवा मुठा उजव्या कालव्याचे पाणी बंद झाल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासून जुना मुठा कालव्याला पाणी येत आहे. या पाण्याला अशुद्ध व घाण पाणी म्हणून अनेक लोकांनी सुरुवातीला नावे ठेवली; परंतु नंतर मात्र याच लोकांनी या घाण पाण्यावरच भाजीपाला पिकवून लाखो रुपये कमावले. हे पाणी उपलब्ध झाले नसते तर आज पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नसता.