कापूरहोळ – भाताचे आगार म्हणून ओळखल्या जाणारा भोर व वेल्हा तालुका यांत्रिक शेतीकडे वाटचाल करीत आहे. यासाठी शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. मोरवाडी (ता. भोर) येथील शेतकऱ्यांना यंत्राद्वारे भात लागवडीची माहिती देण्यात आली.
कृषी विभागाच्या “आत्मा’ अंतर्गत प्रकल्प संचालक अनिल देशमुख, पूनम खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना यंत्राद्वारे भात लागवडीची माहिती देण्यात येत आहे. नुकताच भोर परिसरामध्ये पाऊस झाल्यामुळे यंत्राद्वारे भात लागवड करण्यासाठी रोपवाटिका तयार करण्यास सुरूवात झाली आहे. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती लहू शेलार, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर, मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र डोंबाळे, कृषी पर्यवेक्षक जी. एन. वैराळे, लक्ष्मीकांत कणसे, कृषी सहायक रेणुका सातपुते उपस्थित होते. या अंतर्गत भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी चार हजार रूपये अनुदान देण्यात येते. यंत्राद्वारे भाताची लागवड बियाणे, वेळ, मजुरी यांची बचत होते. एक एकर क्षेत्रावर यंत्राने भात लावणीसाठी दोन तास लागतात. यामुळे शेतकऱ्यांनी यांत्रिकी भात शेतीकडे वळावे, असे वडखेलकर यांनी सांगितले.