हवामान विभाग तालुका पातळीवर हवामानाचा अंदाज देणार
नवी दिल्ली – देशातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांना कामाचे नियोजन करता यावे याकरिता भारतीय हवामान विभाग लवकरच तालुका पातळीवर हवामानाचा अंदाज जाहीर करणार आहे. यामुळे देशातील 660 जिल्ह्यांतील 6500 तालुक्यांतील शेतकऱ्यांना मदत होईल असे विभागाने म्हटले सांगितले.
याचा लाभ देशातील साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना होऊ शकतो. यासाठीची यंत्रणा तयार करण्यात येत असून पुढच्या वर्षापर्यंत ही यंत्रणा कामकाज करू लागेल, असे विभागाचे उपमहासंचालक एस. डी. अत्री यांनी सांगितले. सध्या हवामान विभाग जिल्हा पातळीवर हवामानाचा अंदाज व्क्त करतो. आता विभागाने भारतीय कृषी संशोधन परिषदेने सोबत सहकार्य करार केला आहे. त्यानंतर दोन्ही संस्था एकत्रितपणे या क्षेत्रात काम करणार आहेत.
आता यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे सुरुवातीला 200 तालुक्यासाठी एक प्रयोग केला जात आहे वाढ करून 6500 तालुक्यांमध्ये ही यंत्रणा राबविण्यात येणार आहे. सध्या देशातील चार कोटी शेतकऱ्यांना जिल्हा पातळीवरील हवामानाच्या अंदाजाचा फायदा होतो. हा अंदाज एसएमएस आणि कृषी पोर्टलच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
पुढील वर्षापर्यंत या शेतकऱ्यांची संख्या साडेनऊ कोटींपर्यंत वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी कृषी मंत्रालय आणि राज्याचे कृषी विभाग आवश्यक ती मदत करीत आहेत, असे ते म्हणाले. त्याचबरोबर ही माहिती उपलब्ध आहे याची माहिती देशातील शेतकऱ्यांना होण्याची गरज आहे. त्यासाठी प्रचार मोहीम घ्यावी लागणार आहे.