शेवगाव: फळपिक विम्याचे पैसे मिळाले नसल्याने कृषी आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
तालुक्यातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी जुन 2018 मधे मोसंबी, संत्रा, डाळींब, चिक्कु आदि फळबाग प्रधानमंत्री फळपिक विमा योजनेची रक्कम बॅंकेत भरलेली आहे. दुष्काळामुळे पाण्याअभावी फळबागा जळाल्या काही शेतकऱ्यांना नाइलाजाने त्या तोडून टाकाव्या लागल्या.फळबागासाठी झालेला खर्च पाहता उत्पन्न मात्र काहीच पदरात पडले नाही. परिणामी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
शासन व वीमाकंपनीकडे या शेतकऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. 16 मे रोजी लेखी निवेदनही सादर केले. तरीही विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. मंगळवारी (दि.11) पुणे कृषी आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर संजय शिंदे,सर्जेराव ढाकणे, चंद्रकांत झिरपे, वसंत औटी, महादेव घनवट, बप्पासाहेब पारनेरे, लक्ष्मण टाकळकर यांच्या सह्या आहेत.