हेळगाव – शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने दरवर्षी नवनवीन योजना शेतकऱ्यांसाठी शासन देत असून त्याचा लाभ शेतकऱ्यांनी करून घ्यावा. माणिकराव पाटील यांनी सध्याच्या गरजेप्रमाणे फळबाग लागवड केली त्यांचे शेती करण्याचे तंत्रज्ञान आदर्श घेण्याजोगे असल्याचे मत कराड उत्तरचे आ. बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
पाडळी (हेळगाव) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचेमार्फत सह्याद्रि साखर कारखान्याचे संचालक माणिकराव पाटील यांच्या शेतामध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडीअंतर्गत सीताफळ या फळझाडाच्या लागवडीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी एम. डी. वेताळ, कृषी सहाय्यक सौ. अर्चना निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पाटील पुढे म्हणाले, पाडळी हे गाव पूर्वीपासून पाण्याची कमतरता असणारे गाव आहे. परंतु येथील सर्व शेतकरी मोजक्या पाण्यात कोणते पीक घेऊन उत्पन्न करता येईल याचा विचार करून शेती करत असतात. डोंगराच्या कडेला शेतीचे क्षेत्र असूनही माणिकराव पाटील यांनी डाळिंब, आले, ऊस यासारखे पीक घेण्याबरोबरच शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने सीताफळ या फळाची लागण करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे सांगीतले. यावेळी मानसिंगराव जगदाळे, प्रणव ताटे, संचालक तानाजी जाधव, भास्कर गोरे, संजय कुंभार, डी. बी. जाधव, संजय जगदाळे आणि परिसरातील सर्व शेतकरी उपस्थित होते.