बाधित शेतकऱ्यांना न्याय देऊ
कराड येथील विमानतळ विस्तारीवाढ रद्द व्हावे, यासाठी कृती समितीच्या सदस्यांनी मंत्री महादेव जानकर यांची भेट घेतली. कराड विमानतळ विस्तारीकरणामुळे बागायत क्षेत्र बाधित होणार आहे. तसेच या विमानतळाला पर्यायी जागा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे येथील विस्तारवाढ रद्द करावी, असे निवेदन कृती समितीच्या सदस्यांनी ना. जानकर यांना दिले. यावर विमानतळ प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा करू, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे आश्वासन ना. जानकर यांनी दिले. यावेळी कृती समितीचे पंजाबराव पाटील, हरिश्चंद्र पाटील उपस्थित होते.
कराड – शेतकऱ्यांमध्ये काम मागण्याची नाही तर काम देण्याची दानत आहे.त्यासाठी फक्त ऊसाचे पीक न घेता शेतकऱ्याने मत्स्यपालन, शेळीपालन, कुकुटपालन यासारख्या शेतीपूरक व्यवसायाकडे वळून कॉर्पोरेट शेती केली पाहिजे, असे अवाहन दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री ना. महादेव जानकर यांनी केले.
कराड तालुका लघु पशु चिकित्सालय या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती फरीदा इनामदार, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, तहसीलदार अमरदीप वाकडे, माजी पंचायत समिती सभापती शालन माळी, कोयना दूध संघाचे संचालक संदीप धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. जानकर म्हणाले, सातारा जिल्ह्यात मिळणाऱ्या आर्थिक बजेटमधून काही प्रकल्प आधीच रखडले होते. मात्र आता पंतप्रधान जलसंधारण योजनेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातले सर्व राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
भारतात सातव्या क्रमांकावर असलेले पशुसंवर्धन खाते माझ्याकडे आल्यापासून चार नंबरला आले आहे. या खात्यासाठी केंद्रामध्ये स्वतंत्र मंत्रालय दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. शेतकऱ्याचा मुलगा उद्योगपती व्हायचा असेल तर, फक्त ऊस लावून होणार नाही. तर ग्रामीण भागात या तरुणांना रोजगारासाठी हात दिला पाहिजे.त्या तरुणांना रोजगार देणारे एखादे केंद्र असेल तर ते पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय हेच आहे.
या व्यवसायात दोन एकरात ऊसाचे उत्पादन मिळत नाही, तेवढे उत्पन्न मिळू शकते. शेतकऱ्यांनी या गोष्टींवर थोडा विचार करावा, असेही आवाहन ना. जानकर यांनी यावेळी केले. ना. जानकर पुढे म्हणाले, पशुसंवर्धन विभाग हायटेक करण्यासाठी मोबाईल सिस्टमला मान्यता घेतली आहे. महाराष्ट्रात आपण 80 मोबाईल सिस्टीमसाठी प्रयत्नशील आहे. या मोबाईल ऍपवर सर्व पशुपालक घ्यायचे.
यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये सरासरी दीड लाख पशुपालकांकडून त्यांच्या पशूंना खाद्य किती लागते, त्याला जीनस कुठला आहे, त्याचा रक्तगट कुठला, त्याची तपासणी करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याने ऑनलाइनमुळे डॉक्टरांना काम करणे सोपे होईल. शेतीमध्ये गाईच्या शेणखताचा जास्त वापर केला तर आपले आरोग्य चांगले होईल. सेंद्रिय शेती आपल्याला फायद्याची ठरेल. देशी गायीचे वाढवण्यासाठी जास्तीत-जास्त करून त्यांना तरतूद केली आहे.
यासाठी 25 लाखापर्यंत अनुदान देण्यात येत आहे. केज कल्चरमध्ये योग्य त्या ठिकाणी तज्ञ डॉक्टर भरले जातील. पशुसंवर्धन विभागात कर्मचारी भरण्याबद्दल कमी पडणार नाही. ऍग्रीकल्चर विभागाच्या जास्तीत-जास्त कंपन्या भरण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पंधरा वर्षात एकही अधिकारी भरलेला नव्हता. या रिक्त जागा लवकरच भरणार असल्याचे ना. जानकर यांनी सांगितले. यावेळी पशुसंवर्धन विभागातील विविध योजनांबाबत डॉ. शिंदे यांनी उपस्थितांना माहिती देवून आभार मानले.