नवी दिल्ली – जीवाला धोका असल्याचा आरोप करणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपने जोरदार पलटवार केला आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवाल खोटे आरोप करत असल्याचे भाजपचे नेते आणि दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजेंदर गुप्ता यांनी म्हटले आहे.
सुरक्षेच्या गंभीर मुद्द्यावरून केजरीवाल राजकारण करत आहेत. स्वत:च्या सुरक्षा अधिकाऱ्यांविषयी संशय असेल तर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल का केली नाही? तक्रार दाखल केल्यास पोलीस तातडीने कारवाई करू शकतील, असे त्यांनी म्हटले. तर केजरीवाल यांनी त्यांच्या वक्तव्यातून दिल्ली पोलीस आणि स्वत:च्या सुरक्षारक्षकांचाही अवमान केला. त्यातून त्यांची हीन मानसिकताच उघड होते, असे दिल्ली भाजपचे प्रवक्ते हरीष खुराणा यांनी म्हटले.