फेक न्यूज ही एकट्या भारताची नव्हे तर संपूर्ण जगाची डोकेदुखी होऊन बसली आहे. अफवा पसरविणे फार पूर्वीपासून सुरू असले, तरी डिजिटल तंत्रज्ञानात क्रांती झाल्यानंतर जो सोशल मीडिया प्रत्येकाच्या हातात आला आहे, त्यामुळे नुकसान होण्याच्या घटना जगभरात घडत आहेत. ही समस्या केवळ निवडणुकीपुरतीच मर्यादित नाही, तर ती एक सामाजिक आणि सुरक्षाविषयक समस्या आहे. 2015 नंतर अनेकजण खोट्या बातमीमुळे जीवाला मुकले, असे आकडेवारी सांगते. अशा स्थितीत योग्य नियमावली तयार करण्याची जितकी गरज आहे, तितकीच नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखण्याचीही गरज आहे.
“खोटी बातमी’ अर्थात “फेक न्यूज’ हा कॉलिन्स डिक्शनरीने 2017 साठी अधिकृत शब्द घोषित केला आहे. अर्थात जितका जुना आपला इतिहास आहे, तितकाच “रूमर मॉंगरिंग’ किंवा “अफवा पसरविणे’ हा शब्द जुना आहे; परंतु डिजिटल तंत्रज्ञानाचा स्फोट झाल्यापासून फेक न्यूज हा आंतरराष्ट्रीय घटनांवर प्रभाव टाकणारा घटक बनला आहे. आपल्याच देशातील परिस्थिती पाहिल्यास, अधिकृत माहितीनुसार 2015 पासून 92 व्यक्तींची हत्या खोट्या बातम्यांमुळे झाली आहे.
फेक न्यूज : प्रश्न आहे जबाबदारीचा (भाग-२)
फेक न्यूज : प्रश्न आहे जबाबदारीचा (भाग-३)
नोव्हेंबर 2018 मध्ये बीबीसीकडून “ड्युटी, आयडेन्टिटी, क्रेडिबिलिटी : फेक न्यूज अँड ऑर्डिनरी सिटिझन इन इंडिया’ नावाने एक अध्ययन करण्यात आले. याद्वारे खोट्या बातम्यांच्या गुणसूत्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका आठवड्याच्या कालावधीत भारत, नायजेरिया आणि केनिया या तीन देशांमधील 80 लोकांशी संवाद साधण्यात आला. फेसबुक आणि व्हॉट्स ऍपवरून येणाऱ्या माहितीचा वापर कशा प्रकारे केला जातो याची माहिती घेऊन त्याचे विश्लेषण करण्यात आले. आलेली माहिती इतरांना फॉरवर्ड करताना माहितीचा मूळ स्रोत आणि खरे-खोटेपणा याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्नच केला जात नाही, हे या अभ्यासातून पुढे आले. आलेले संदेश जसेच्या तसे फॉरवर्ड करण्यामागील मानसिकता जाणून घेतली असता, कोणतीही व्यक्ती आधीपासूनच विशिष्ट विचारांनी प्रेरित असते आणि त्या विचारांच्या बाजूने आलेला कोणताही संदेश सत्यासत्यता न पडताळता फॉरवर्ड केला जातो, असे दिसून आले. ही प्रवृत्ती खोटी माहिती पसरविण्यास कारणीभूत ठरल्याचे लक्षात आले. सर्वेक्षणादरम्यान ज्यांना प्रश्न विचारण्यात आले, त्यांच्यापैकी काहीजणांच्या मते, “हा संदेश माझ्या मित्राने मला पाठविला आहे. तो खोटा संदेश का पाठवेल?” असा प्रतिप्रश्न उपस्थित केला, यातच सर्वकाही आले!
– एस. वाय. कुरेशी, माजी निवडणूक आयुक्त