दुष्काळापुढे बळीराजा हतबल : खटाव-माण तालुक्यातील विदारक वास्तव
प्रशांत जाधव
दुष्काळग्रस्तांना मदतीची गरज
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर झाली आहे. त्याची दाहकता खटाव, माण या दोन्ही तालुक्यात जास्त प्रमाणात आहे. दुष्काळात होरपळून निघाणाऱ्या बळीराजाला सावरण्यासाठी, पशुधन वाचवण्यासाठी समाजातील दानशूर लोकांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.सातारा – “येरे येरे पावसा’ हे गाणे लहानपणी पावसात भिजतानाच बोलणाऱ्या खटाव, माण तालुक्यातील चिमुरड्यांना आता पाणी शेंदून जीव कासावीस झाल्याने खरोखरच पावसाला जीव तोडून साकडे घालावे लागत आहे. ज्या वयात मामाच्या गावाला जायचं त्याच वयात या तालुक्यातील पोरं छावणीच्या सावलीला आपलं भविष्य गिरवताना दिसत आहेत. पोरांच्या या अवस्थेबरोबरच सध्या या तालुक्यातील जनवारांची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे चारा छावणीत कमी अन् कत्तलखान्यातच जादा जनावरे जाताना दिसत आहेत. वरूण राजाच्या अवकृपेने बळीराजा मात्र पुरता हतबल झाल्याचे दिसत आहे.
यावर्षी दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून जनावरे विकण्याशिवाय त्यांच्यापुढे कोणताच पर्याय उरला नाही. एकीकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे दुष्काळी दौरे, तर दुसरीकडे नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, अशी स्थिती खटाव, माण या तालुक्यात आहे. संपूर्ण जिल्हा दुष्काळाने होरपळत असून शेतकरी दुष्काळाशी सामना करताना अक्षरशः रडकुंडीला आला आहे.
यावर्षीचा दुष्काळ हा 1972 सालाच्या दुष्काळापेक्षा मोठा आहे. या दुष्काळाच्या झळा शहरातील नागरिक आणि शेतकऱ्यांना बसत आहेत. तर जनावरांची अवस्था तर खूपच दयनीय झाली आहे. चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी जनावरे विकण्याचा निर्णय घेतला मात्र जनावरांच्या बाजारात जनावरांना मायेचा हात फिरवणार एकही शेतकरी विकत घेताना दिसत नाही. उलटपक्षी व्यापारी व कसाबाव्यतिरिक्त गिऱ्हाईकच मिळत नसल्याची सत्य परिस्थिती आहे.
उन्हाळा संपत आला तरीही जनावरांसाठी शासनाकडून हव्या तेवढ्या प्रमाणात चारा छावण्या सुरू केल्याचे दिसत नाही. त्यामुळे जनावरांना हिरवा चारा मिळणे दुरपास्त झाले आहे. वैरण नसल्याने जनावरांची पोटे खपाटीला गेली आहेत. छावणीत जायच तर गावापासून दूर जावे लागणार, न जावे तर जनावरे कशी जगवणार? या धर्म संकटात शेतकरी सापडला आहे.
ग्रामीण भागात तर जनावरे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांऐवजी व्यापारी, दलालच गावोगावी फिरत आहेत. ते जनावरांच्या किमती पाडून मागत आहेत. गावागावात जनावरे खरेदीसाठी कमिशन एजंट व दलाल सक्रिय असल्याचे दिसत आहे. व्यापारी आणि दलाल शेतकऱ्याकडून खरेदी केलेली जनावरे चोरमार्गाने टेम्पोत भरून ती कत्तलखान्यात व कसाबाच्या दावणीला नेत आहेत. हा प्रकार असाच सुरू राहिला तर भविष्यात शेती मशागतीला व दुध दुभत्यासाठी दारात जनावरे दिसणे दुरापास्त होईल.
जनावरांना शेतात चारा नाही. पाच-सहा गायी, बैल असून कडबाच नाही. मला यावर्षी कडबा विकत घ्यावा लागत आहे. त्याचे दर तर आकाशाला भिडले आहेत. शासनाने परिसरात तत्काळ चारा छावणी सुरू करावी. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर चालू करावा.
विश्वास घाडगे , शेतकरी