मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येचा दौरा करणार आहेत. प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येला उद्धव ठाकरे १६ जून रोजी भेट देणार आहेत. उद्धव ठाकरेंबरोबर शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदारही राहणार आहेत. सहा महिन्यांपूर्वीच म्हणजे लोकसभा निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी राम मंदिराच्या बांधकामाचा मुद्दा उचलत उद्धव यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं होतं.
दरम्यान, यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे १० वेळा अयोध्येला गेले तरी राम मंदिर होणार नाही, असे वक्तव्य केले आहे. मुस्लीम समाजावर याप्रकरणी अन्याय होऊ नये. त्याठिकाणी मूळ बुद्धभूमी असल्याने बौद्ध मंदिर व्हावं अशी आमची मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय असेल तो आम्हाल मान्य असेल,असेही त्यांनी स्पष्ट केले.
हिंदू समाजाला ती जागा मिळावी तेथे राम मंदिर व्हावे, उद्धव ठाकरे त्याठिकाणी दहा वेळा जरी गेले तरी त्यांच्या जाण्याने काही होणार नाही. सर्वोच न्यायालयाच्या निकालानानंतरच त्याठिकाणी राम मंदिर होऊ शकते. लोकांच्या मताचा विचार केला तर त्याठिकाणी राम मंदिर व्हायला पाहिजे या मताचा मी असल्याचे आठवले म्हणाले.