नवी दिल्ली- केंद्र सरकारने जलस्त्रोत खाते आणि पेयजल खाते ही दोन्ही खाती एकत्रित करून जलशक्ती हे नवीन खाते सुरू केले आहे. त्याचा कार्यभार गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे देण्यात आला आहे. पाण्याविषयीच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी तसेच पाणी पुरवठ्याच्या सोयी वाढवण्यासाठी सर्व विभाग एकत्र करून हे मंत्रालय तयार करण्यात आले आहे. आम्ही जल संबंधीत सर्व कामे या मंत्रालयामार्फत मार्गी लाऊ असे शेखावत यांनी आज या मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नमूद केले. नमामी गंगा प्रकल्पापासून आंतरराष्ट्रीय जलविवादा पर्यंतचे सर्व विषय या एकाच मंत्रालयाकडून हाताळले जाणार आहेत.
गंगा शुद्धीकरण ही मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. त्यासाठी मोदी सरकारने बराच प्रयत्न केला असला तरी अजून गंगा पुर्ण शुद्ध होऊ शकलेली नाही. या नदीत जे प्रदुषित पाणी सोडले जाते ते शुद्ध करून सोडण्यासाठी या नदीच्या काठांवर ठिकठिकाणी प्रदुषित पाणी शुद्धीकरणाचे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे गंगा शुद्धीकरणाचे काहीच काम झाले नाही हा आरोप खरा नाही असे शेखावत यांनी यावेळी नमूद केले. रतनलाल कटारिया हे या खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पहाणार आहेत.