सातारा – पावसाळ्यामध्ये कीटकजन्य व जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. पावसाळ्यात आणि पावसाळ्याच्या पश्चात ही आरोग्य संस्था 24 तास कार्यरत ठेवण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरूद्ध आठल्ये यांनी दिले आहेत.
वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे अधिकारी व कर्मचारी नेमून दिलेल्या ठिकाणी राहणार नाहीत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. आपत्कालिन परिस्थितीचा सामना करण्याकरिता शिघ्र कृती दल स्थापन करून त्यासाठी आवश्यक वाहन आणि रुग्णवाहिका सुस्थितीत ठेवाव्या लागणार आहेत. आरोग्य संस्थेमध्ये आलेल्या रुग्णांना वेळीच औषधोपचार करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. सकाळी आणि संध्याकाळी बाह्य रुग्ण विभाग नियमित सुरू ठेवण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोतांचे शुद्धीकरणाची ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून दैनंदिन शुद्धीकरण तपासणी करण्याचे देखील आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहेत.