प्रा. विजया पंडित
1953 मध्ये जिथे मानवाने पहिले पाऊल ठेवले, त्या एव्हरेस्टवर कधी “ट्रॅफिक जॅम’ अनुभवावा लागेल, असे कुणाला त्यावेळी वाटलेही नसेल. परंतु आज तीन-चार लोक उभे राहू शकतील एवढ्या जागेत दोन डझन
माणसे उभी राहून गिर्यारोहक सेल्फी काढताना दिसतात. दर्शनबारीप्रमाणे जाणाऱ्यांची आणि येणाऱ्यांची स्वतंत्र रांग पाहायला मिळते. त्यातूनच बर्फाळ थंडीत अधिक काळ राहणे आणि ऑक्सिजनची कमतरता यामुळे अनेक गिर्यारोहक नजीकच्या काळात मृत्युमुखी पडले आहेत. महसूलप्राप्तीसाठी नियम डावलले जात असले, तरी निसर्गनियम कसे टाळणार?
जगातील सर्वांत उंच पर्वतशिखर असणाऱ्या माउंट एव्हरेस्टची छायाचित्रे “एजन्स फ्रान्स प्रेस’ या वृत्तसंस्थेने गेल्या आठवड्यात जारी केली. गिर्यारोहक इतक्या मोठ्या संख्येने एव्हरेस्टवर चढाईसाठी जात आहेत की, या पर्वतशिखरावर “ट्रॅफिक जॅम’सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, असे दर्शविणारी ही छायाचित्रे आहेत. त्यानंतर लगेच अशी बातमी आली की नऊ दिवसांत एव्हरेस्टवर 11 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. त्यानंतर हृदयाला पीळ पाडणारा एक व्हिडिओ समोर आला. त्यात काही गिर्यारोहक एव्हरेस्टच्या दिशेने आगेकूच करीत असून, वाटेत पडलेल्या एका महिला गिर्यारोहकाच्या मृतदेहाला ओलांडून ते शिखराकडे अग्रेसर होताना दिसत आहेत.
म्हणजेच केवळ गिर्यारोहकच नव्हे तर निर्दयीपणाही “एव्हरेस्ट’ सर करीत आहे. विशेष बाब अशी की, ज्या कालखंडात एव्हरेस्टवर 11 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला, तेव्हा तिथे कोणतेही हिमवादळ झाले नाही अथवा गिर्यारोहकांना अडथळा निर्माण होईल, इतके हवामानही बिघडले नाही. बहुतांश मृत्यूंचे कारण 29029 फूट उंचीवरील “फ्रास्ट बाइट’ म्हणजे बर्फाळ थंड हवा हेच होते. सामान्यतः असे मानले जाते की, एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपासून निघाल्यानंतर शक्य तितक्या लवकर एव्हरेस्टवर चढणे आणि शक्य तितक्या लवकर परत फिरणे आवश्यक आहे. परंतु आता ते फारसे शक्य राहिलेले नाही आणि गिर्यारोहकांचा बराचसा वेळ एव्हरेस्टवर “सेल्फी’ काढण्यातच जातो.
याच कालावधीत ऍरिझोना येथील एड डोर्हंरग जेव्हा एव्हरेस्टवर पोहोचले, तेव्हा त्यांना असे दिसून आले की, जिथे तीन ते चार लोक उभे राहू शकतील एवढी जागा आहे, तेवढ्या जागेत सुमारे दोन डझन माणसे दाटीवाटीने उभी आहेत. त्यातील अनेकजण सेल्फी घेत होते. वस्तुतः जितका अधिक वेळ गिर्यारोहक एव्हरेस्टवर थांबेल तितकाच त्याला बर्फाळ थंडीचा धोका अधिक असतो, हा साधा निसर्गनियम आहे. भारतीय गिर्यारोहक अमीषा चौहान हिला एव्हरेस्टवरून उतरण्यासाठी तब्बल वीस मिनिटे प्रतीक्षा करावी लागली. अनेकांना तर तासन्तास वाट पाहावी लागली.
नेपाळ सरकारने या मोहिमेवर जाण्यासाठी यावर्षी आतापर्यंत 381 गिर्यारोहकांना परवानगी दिली आहे आणि अजून बराच हंगाम बाकी आहे. नेपाळसाठी एव्हरेस्ट शिखर हे बऱ्याच वर्षांपासून “डॉलरची खाण’ ठरले आहे. या शिखरावर जाण्यासाठी नेपाळ सरकार गिर्यारोहकांक़डून प्रत्येकी 11 हजार डॉलर शुल्क आकारते. गिर्यारोहणाचे किमान कौशल्य संबंधिताने प्राप्त केले आहे की नाही, हे पाहण्याची अटसुद्धा पूर्ण केली जात नाही. चीन सरकारकडून नेपाळच्या तुलनेत अत्यंत माफक शुल्क आकारून “एव्हरेस्ट पर्यटन’ या नावाखाली पर्यटकांना आमंत्रित केले जात असताना नेपाळ सरकारला मिळणारी ही कमाई सरकार का सोडेल? जगभरात आता अशी धारणा निर्माण झाली आहे की, शुल्क भरण्यासाठी, आधुनिक उपकरणांसाठी आणि शेरपा मंडळींना सेवाशुल्क देण्यासाठी ज्याच्याजवळ बक्कळ पैसा आहे, तोच एव्हरेस्ट सर करू शकतो.
1953 मध्ये जेव्हा शेरपा तेनजिंग आणि एडमंड हिलेरी जेव्हा पहिल्यांदाच एव्हरेस्टवर पोहोचले होते, तो दिवस मानवी संस्कृतीच्या इतिहासातील अनमोल दिवस होता, हे खरे. जिथे मानव कधीच पोहोचू शकला नव्हता, तिथे हे दोघे पोहोचले होते. परंतु आता एव्हरेस्ट मोहिमा म्हणजे एक खेळच बनला आहे. माउंट एव्हरेस्टवर तीन भारतीय गिर्यारोहकांच्या मृत्यूची बातमी नुकतीच आली. मोहिमेदरम्यान थंडीची लाट आणि ऑक्सिजनची कमतरता याबरोबरच गिर्यारोहकांना अक्षरशः रांगेत थांबावे लागण्याची निर्माण झालेली परिस्थिती या गिर्यारोहकांसमोरील प्रमुख अडचणी असल्याचे सांगितले जाते. अतिउंचीवर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बेशुद्ध होणे आणि लांबच लांब रांग असल्यामुळे पुन्हा आपल्या कॅम्पमध्ये परतण्यास होणारा उशीर ही मृत्यूची प्रमुख कारणे ठरली. प्रदीर्घकाळ आपल्यातील ऊर्जा राखणे हे एव्हरेस्टवर प्रमुख आव्हान असते. 2017 मध्येही अशा प्रकारच्या “ट्रॅफिक जॅम’मुळे गिर्यारोहकांना कॅम्पमध्ये पोहोचण्यास सुमारे तीन तासांचा विलंब झाला होता. त्यामुळे काही गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता.
नेपाळ आणि चीनचे स्वायत्त क्षेत्र (ऑटोनॉमस रीजन ऑफ चायना) अशा प्रदेशात तिबेटच्या सीमेवर माउंट एव्हरेस्ट आहे. 8850 मीटर उंचीचे हे शिखर जगातील सर्वोच्च आहे. दक्षिण नेपाळच्या बाजूने अंतिम पर्वतरांगांवर केवळ एक कायमस्वरूपी दोर आहे. याच दोराच्या आधारे प्रत्येक गिर्यारोहक अंतिम चढण चढतो. जेव्हा या भागात मोठी गर्दी होते, तेव्हा गिर्यारोहकांच्या दोन रांगा केल्या जातात. एक रांग शिखरावर जाणाऱ्यांची तर दुसरी परतणाऱ्यांची असते. जेव्हा एकाच वेळी अनेक गिर्यारोहक शिखराची चढाई करीत असतात, तेव्हा या भागात “ट्रॅफिक जॅम’ची परिस्थिती निर्माण होते. विशेषतः 8000 मीटरच्या वर अशी स्थिती अधिक खतरनाक असते. त्यामुळेच त्याला मृत्यू क्षेत्र (डेथ झोन) मानले जाते. आधीच थकलेल्या गिर्यारोहकाला एकुलत्या एका दोरावरून शिखरावर चढण्यासाठी वा तिथून उतरण्यासाठी अनेक तास रांगेत थांबावे लागते. त्यामुळे अत्यधिक थकवा, हिमदंश किंवा उंचीवरील अशक्तपणा (आल्टिट्यूड सिकनेस) अशा समस्या वाढतात. अनेकदा एव्हरेस्ट मोहिमेच्या अंतिम टप्प्यात ऑक्सिजनचा सिलिंडर संपून जातो. एव्हरेस्टवर पोहोचण्याचा मार्ग दुर्गम आणि जोखमीचा आहे.