गावातले पाणी गावात साठवण्याची गरज; खरशिंदे येथे केले श्रमदान
संगमनेर: माती, पाणी, जंगल हीच खरी देशाची खरी संपत्ती असून, तिचे संवर्धन व संरक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जलसंधारणामध्ये गावातील लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. गावातील पाणी गावातच साठविल्याने गावात पाणीसाठा वाढेल. सिंचनासाठी पाणी वाढल्याने गावचे सक्षमीकरणासाठी व अर्थ करण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असे मत कॉंग्रेसनेते माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
संगमनेर तालुक्यात वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेतलेल्या गावांमधील नागरिकांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी व जल संधारणाचे महत्त्व वाढीस लावणेसाठी कॉंग्रेसचे वरीष्ठ नेते माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी पठार भागातील खरशिंदे व कणेसेवाडीत रविवारी (दि.26) पदाधिकाऱ्यांसह श्रमदान सहभाग घेतला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, इंद्रजीत खेमनर, सरपंच मिनाक्षी भोर, प्रा. बाबा खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी थोरात म्हणाले की, सिनेअभिनेता अमिर खान यांनी सुरू केलेली ही स्पर्धा नक्कीच दुष्काळ निवारण्यासाठी फायदेशीर ठरत आहे. तालुक्यातील गावे पाणीदार करण्यासाठी गावातील लोकांच्या सहभाग कौतुकास्पद असून, श्रमदानातून कायमचा दुष्काळ मिटवण्यासाठी हजारो हात कार्यरत असून, उन्हाची तमा न बाळगता रात्रंदिवस हे सर्व काम करीत आहे, ही बाब स्तुत्य आहे. तरुणाई महिला ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक संघटित होऊन, भावी पिढी सुखी व समृद्ध व्हावी. आपले पाणी आपल्यासाठी ही संकल्पना निश्चित यशस्वी होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.