उल्हासनगर – उल्हासनगर येथील मतदान केंद्रावर एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मतदान केंद्रावर कामावर असताना अचानक ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या आणि अंतिम टप्प्यासाठी सोमवार, दि. 29 एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच मतदान केंद्रावर मतदानाची तयारी सुरू आहे. त्यावेळी कामावर असताना भगवान मगरे या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान मगरे मीनल अर्जुन विद्यालय सी ब्लॉक या मतदान केंद्रवर कामावर होते. ते दुपारी जेवण झाल्यानंतर सावलीत बसले होते. पण अचानक त्यांना भुरळ आली आणि ते खाली कोसळले. ते खाली कोसळताच त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, भगवान मगरे यांच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांकडून वर्तवण्यात आला आहे. तर पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.