आंबेगाव – द शेतकरी शिक्षण मंडळाच्या नऱ्हे येथील भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात करण्यासाठी 1 लाखांमध्ये इलेक्ट्रिकल कारची निर्मिती केली आहे. 3 तासांच्या चार्जिंगमध्ये ही कार 50 किलोमीटर धावते, अशी माहिती “टीएसएसएम’चे विश्वस्त ऋषिराज सावंत, प्राचार्य डॉ. गणेश हिंगे, प्रा.आशिष किनगे यांनी दिली.
केंद्र सरकारने 2025 पर्यंत पेट्रोल-डिझेलची वाहने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर केवळ इलेक्ट्रिकल वाहनेच विकली जाणार आहेत. त्यात 15 वर्षांपुढील पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांवरही निर्बंध घालण्यात आले आहे. आशावेळी जी वाहने 15 वर्षांपुढे झाली आहेत. ती “स्क्रॅप’मध्ये देण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.
या समस्येवर मात करण्यासाठी विभाग प्रमुख प्रा.आशिष किनगे, मार्गदर्शक प्रा. धनंजय सरगर, प्रा. डी. आर. पिसाळ, डॉ. एस. जी. कानडे आदींच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या कारची निर्मिती केली आहे. विद्युत अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या ऋषिकेश खेडकर, संदीप बाबर, ऋषिकेश जगताप, श्रीकांत दुधाने, मयूर तनपुरे, ओंकार डोळे, रोहित खवास, हिमानी पाटील, गायत्री घस्ते या विद्यार्थ्यांनी सोळा वर्षे जुन्या इंधनावर चालणाऱ्या कारला “इलेक्ट्रिकल कार’मध्ये परिवर्तित केले.
गाडीचे जुने इंजिन काढून त्याजागी 7.5 एचपीची इलेक्ट्रिकल मोटर बसवण्यात आली. या कारमध्ये लिथिअम आयन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. ही कार चार्ज होण्यासाठी 3 तास लागतात व एकदा चार्ज केल्यावर ती 50 किलोमीटर चालू शकते. भारतात “इलेक्ट्रिकल कार’ त्यांच्या प्राथमिकस्तरावर असल्यामुळे त्यांच्या किमती जास्त आहेत व त्या प्रत्येकाला परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे आपली जुनी वाहने कमीत कमी किंमतीत “इलेक्ट्रिकल कार’मध्ये परिवर्तित करण्याचा चांगला उपाय या विद्यार्थ्यांनी लोकांसमोर उभा केला आहे. या कारची टाटा मोटर्सच्या मनोज बडवे यांनी पाहणी करून विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक केले.