अकोले – महावितरण कंपनीची शॉकिंग ट्रिटमेंट सुरू असल्याने तालुक्यातील पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अजूनही अकोले तालुका 100 टक्के अंधारात असून, विस्कळीत झालेल्या वीजपुरवठ्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. पाणीपुरवठा योजना तर बंद आहेतच. पण “रोटी’चा प्रश्नही त्यामुळे उपस्थित झाला आहे. मात्र पावसामुळे निळवंडे धरणात नवीन पाणी आवक सुरू झाली.
रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता अकोले तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर अकोले तालुक्यातील सर्वच गावे अंधारात बुडाली आहेत. खंडित होणारा वीजपुरवठा जनजीवन प्रभावित करून गेला आहे. पिठाच्या गिरण्या बंद झाल्यामुळे घरची चूल बंद पडली आहे. शिवाय विजेशी निगडित सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.
याबाबत महावितरण कंपनीचे सहायक अभियंता ज्ञानेश बागूल यांच्याशी संपर्क केला असता, या वादळामुळे 18 गावे प्रभावित झाली आहेत. मुख्य वाहिनीचे 48 आणि एलटी लाइनचे 86 पोल खाली पडले.
त्यांच्या तारा तुटल्या. तर मेन लाइनचे उभ्या खांबांपैकी 32 खांब वाकले आणि एलटी लाईनचे 52 खांब वाकले. त्यामुळे सर्व वीजपुरवठा सुरळीत करण्याला आमचे प्राधान्य असूनही आम्हाला मर्यादा पडल्या आहेत. एवढेच नाही तर अकोल्याच्या जवळील एक ट्रान्सफॉर्मर जळाला असून, त्याचीही तातडीने युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू आहे, असे ते म्हणाले. 56 कर्मचाऱ्यांना हाताला घेऊन व मेंटेनन्सच्या 5 मजूर टोळ्या हाताला घेऊन रात्रंदिवस वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आमचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत, असे स्पष्ट करताना काल रात्री अकोल्याचा अंशतः वीजपुरवठा सुरळीत करण्याला आम्ही प्राधान्य दिले.
काल सायंकाळपर्यंत अकोले सारख्या शहरी भागातील वीजपुरवठा 60 टक्क्यांपर्यंत सुरळीत झाला. आज सकाळी 20 व रात्री 20 टक्क्यांपर्यंत, असा 100 टक्के वीजपुरवठा सुरळीत होईल, असा दावा त्यांनी केला. मात्र तसे घडले नाही. आज काही ठिकाणी सकाळी वीजपुरवठा सुरू झाला. पंखे फिरले, मोबाईलचे चार्जिंग सुरू झाले, पिठाच्या गिरण्या सुरू झाल्या, लाकडी वखारीचे कार्य सुरू झाले, नेट सुरू झाले आणि अचानक तोही पुरवठा खंडित आहे. त्यामुळे महावितरण कंपनीची “शॉक ट्रिटमेंट’ सुरू असल्याची भावना जनतेमध्ये आहे.
कळस बुद्रुक, केळी, समशेरपूर, वीरगाव, गणोरे, डोंगरगाव मोबाईल टॉवर यांचाही पुरवठा खंडित झाल्याने तेथील व त्या परिसरातील असणारे सर्व मोबाईल सेवा बंद होती. तालुक्याच्या सर्व भागांमध्ये काल रात्री पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र पाऊस म्हणावा तसा झाला नाही. काल तालुक्यात पाऊस कमी अधिक हजेरी लावून गेला. काल निळवंडे धरणात तीन दलघफू नवीन पाणी आवक झाली. गेल्या चोवीस तासांत झालेली पावसाची नोंद पुढील प्रमाणे (मिलिमीटरमध्ये)- भंडारदरा 2, निळवंडे 3, अकोले 5, रतनवाडी 2, वाकी 4 व कोतूळ 33.