मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील 48 मतदार संघातील मतमोजणीची तयारी पुर्ण झाली असून दुपारपासून या मतमोजणीचे कल हाती येण्यास सुरूवात होईल आणि प्रत्यक्ष निकाल हाती येण्यास सायंकाळ उजाडणार आहे. महाराष्ट्रात झालेल्या मतदान प्रक्रियेत एकूण 98 हजार 430 इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रे वापरली गेली आहेत. या यंत्रावरील मतमोजणी 38 ठिकाणच्या 48 केंद्रांवर होणार आहे.
दुपारी चार वाजेपर्यंत बहुतांश निकाल हाती येणे अपेक्षित आहे असे एका संबंधीत अधिकाऱ्याने सांगितले. सर्वाधिक जागांच्या बाबतीत महाराष्ट्राचा उत्तरप्रदेश खालोखाल दुसरा क्रमांक लागतो. येथे एकूण चार टप्प्यांमध्ये मतदान झाले असून राज्यातील 48 मतदार संघात एकूण 867 उमेदवार उभे आहेत. राज्यातल्या चार टप्प्यातील मतदानात एकूण 60.80 टक्के इतके मतदान झाले आहे.