पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश असलेल्या मावळ आणि शिरुर या दोन्हीही लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच अटीतटीच्या लढती पहायला मिळाल्या आहेत. यामुळे उमेदवाराला कमी मताधिक्य मिळाल्यास फेरमतमोजणीची मागणी होणार की काय? याची धास्ती निवडणूक अधिकाऱ्यांना पडली आहे. जर पुर्नमतमोजणीची मागणी झाली तर मात्र निकालाला मोठा उशीर होऊन अधिकाऱ्यांनाही घाम गाळावा लागणार आहे.
मतदानानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून विजयाचे दावा केला जात आहे. काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी तर मिरवणुकीची तयारीही केली आहे. मात्र, अटीतटीच्या झालेल्या लढतीमुळे विजयी उमेदवारांचे मताधिक्यही कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुरूवातीला “लाखो मतांनी निवडून येऊ,’ असे दावे ठोकणारे दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आता हजारांवर उतरले आहेत. विजय आणि पराजयातील अंतर अत्यल्प असल्यास फेरमतमोजणीची मागणी होणार की काय, याची धास्ती प्रशासनाला पडली आहे.