नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये अनेकवेळा आचार संहितेचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पाठोपाठ एक अशी सलग क्लीन चिट मिळाल्याने अत्यंत नाराज झालेल्या निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आचार संहिता बैठकींवरच बहिष्कार टाकला. या मुद्यावरून निवडणूक आयोगामधील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. याबाबत निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांची नाराजी दूर करण्यासाठी मंगळवारी (21 मे) आयोगाने एक बैठक बोलविली आहे.
आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, निवडणूक आयोगाच्या तीनही सदस्य एकमेकांची कॉपी असू शकत नाही. अनेक वेळा विचारांमध्ये मतभिन्नता असते. हे होऊ शकते आणि असायलाही पाहिजे. प्रत्येकाचे दृष्टीकोन वेगवेगळे असतात. अंतर्गत वाद आहेत. परंतु, ते अव्यवहार्य आहेत. मी कोणत्याही वादापासून लांब राहत नसून प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते, असे त्यांनी सांगितले आहे. लवासा यांची नाराजी दूर करण्यासाठी 21 मे ( मंगळवारी) रोजी निवडणुक आयोगाची पुर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.