पुणे – जिल्ह्यात झालेल्या वळीवाच्या पावसामुळे बळीराजचाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक घरांचे व गोठ्यांच शेड उडून गेले आहेत. तसेच काढणी योग्य उन्हाळी बाजरीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. जनावरांसाठी असलेली ज्वारी, मका हे पिके वाऱ्याने पडून जमीनदोस्त झाली आहेत. काढून ठेवलेला कांदा भिजल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
महाळुंगे इंगळे – महाळुंगे इंगळे व परिसरातील नाणेकरवाडी, खराबवाडी, येलवाडी, खालुंब्रे, कान्हेवाडी, सावरदरी आदि भागात शुक्रवारी (दि. 8) सायंकाळी मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजरी लावली. त्यामुळे परिसरात सलग आठ तास वीज गायब झाल्याने वीज कंपनीचे मान्सूनपूर्व पावसातच पितळ उघडे पडले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महाळुंगे इंगळे भागातील नागरिक अन्हाच्या प्रचंड उकाड्याने त्रस्त झाले होते. मात्र, शुक्रवारी रात्री उशिरा वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. विजेचा कडकडाट, वादळी वारा यामुळे बराच वेळ येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रस्त्यावर पाण्याची मोठमोठी तळी साचली होती. तर वादळामुळे काही भागात उन्हाळी बाजरी भूईसपाट झाली. कांदा, वीटभट्टी वरील विटांचे भिजून अतोनात नुकसान झाले. कामगारांची मोठी धावपळ झाली.