राज्यभरात ठिकठिकाणी सर्वेक्षण सुरू
पुणे – राज्यातील सर्व गावे आणि वाडयावस्त्या प्रकाशमान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या पाहणीत ही माहिती समोर आली आहे. येथे वर्षाच्या अखेरीपर्यंत वीज पोहचविण्याचा संकल्प प्रशासनाने सोडला आहे. त्यासाठी निधी खर्च करण्याची तयारीही प्रशासनाने सोडला आहे.
राज्याची भौगोलिक परिस्थिती खूपच वेगळी आहे. बहुतांशी गावांना जाण्यासाठी मोठे डोंगर, दऱ्या आणि नद्या पार कराव्या लागत असल्याने या गावांपर्यंत वीज पोचविणे हे महावितरणच्या समोर मोठे आव्हान आहे, तरीही प्रशासनाने गेल्या काही वर्षांमध्ये अथक परिश्रम करुन अशा बाराशे गावांपर्यंत वीज पोचविण्यात आली आहे. त्यामुळे ही गावे प्रकाशमान झाली आहेत, हे वास्तव असतानाच अद्याप साडेसहा हजार गावे आणि वाड्यावस्त्यांवर वीज पोचविण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. अशा गावांचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या वतीने सर्व परिमंडलांना देण्यात आल्या होत्या, त्यानुसार गेल्या वर्षभराच्या कालावधीत महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यासाठी सर्व्हेक्षण करत आहेत, अशी माहिती महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी दिली.