-विजय शेंडगे
संदीप तापकीर हे दुर्गप्रेमी. किल्ल्यावरची भटकंती त्यांना विशेष आवडते. पण त्यांनी त्यांच्या भटक्या प्रवृत्तीला वळण लावलं. तिला शब्दांत बांधलं. परंतु त्या लेखनाला प्रवासवर्णनाचा बाळबोधपणा येऊ दिला नाही. आपण एक ऐतिहासिक दस्तऐवज जन्माला घालतो आहोत याचं भान त्यांनी “अपरिचित दुर्गांची सफर : रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले’ हे पुस्तकं लिहिताना बाळगलं आहे. विश्वकर्मा पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.
छत्रपती शिवरायांच्या सर्व किल्ल्यांची जिल्हानिहाय माहिती उपलब्ध करून द्यावी हा त्यांचा मनोदय. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व किल्ल्यांचा बारकाईने अभ्यास केला. संदर्भ ग्रंथांचा धांडोळा घेतला आणि त्यातून या पुस्तकाची निर्मिती झाली. खरंतर तापकीर यांच्या दुर्ग भ्रमंतीमधून हे पुस्तक जन्माला आलं आहे. त्यामुळे त्याला प्रवास वर्णनाचा वास यायला हवा होता. पण तसं झालेलं नाही. जिथे जिथे छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा उमटल्या आहेत त्या दुर्गांवर आपण लिहीत आहोत याचे भान त्यांनी बाळगलं आहे.
त्यामुळेच ऐतिहासिक भाषेचा डामडौल या पुस्तकात पानोपानी जाणवतो. जंग्या, फांजी, जुंबरे, साकरण्या, देवड्या, चुनेगच्ची, तरांडे अशा कितीतरी ऐतिहासिक शब्दांची पेरणी या पुस्तकाच्या सौंदर्यात भर घालते. पेठ हे रसाळगडाच्या “घेऱ्यातील’ गाव आहे अथवा महिमतगड हा किल्ला घाटमाथ्याच्या रांगेतून “सुटावलेल्या’ रांगेवर वसला आहे. अशासारख्या कितीतरी वाक्यरचना लेखकाच्या भाषिक सुबत्तेची साक्ष देते.
महाबळेश्वरला गेल्यावर आर्थर पॉइंट पाहिला नाही असा इसम सापडणे दुर्मिळ. पण त्या आर्थर पाइंटची आख्यायिका आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते. त्याचबरोबर बारवाईच्या किल्ल्यावरील “सतीच्या कड्याची’ आख्यायिकाही यात आहे. अशा अनेक कहाण्या, आख्यायिका यात आहेत. त्यामुळे पुस्तक मनोरंजकसुद्धा झाले आहे. प्रत्येक किल्ल्याची सनावळी दिल्यामुळे किल्ल्यांचा जन्मकाळ आणि किल्ल्यांचे एकूण आयुष्य याचे गणित आपल्याला मांडता येते.
रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ल्यांची माहिती देणारे प्रत्येक किल्ल्यावर एक याप्रमाणे 28 लेख यात आहेत. प्रत्येक लेखाच्या शेवटी एका दृष्टिक्षेपात या मथळ्याखाली चौकटीत किल्ल्याचे लोकेशन, जायचे कसे, चढण कशी, पिण्याच्या पाण्याची, मुक्कामाची व्यवस्था आहे की नाही. त्या किल्ल्याच्या परिसरातील प्रेक्षणीय ठिकाणे अशी माहिती दिली आहे. त्यामुळे प्रत्येक दुर्गप्रेमींनी, दुर्गभ्रमण करणाऱ्या रसिकांनी हे पुस्तक जवळ बाळगायलाच हवे.