-दत्तात्रय आंबुलकर
आपल्याकडे धार्मिक संदर्भात विविध व्रतांच्या कथा असतात. या कथांमध्ये एखाद्या देवतेचे व्रत सांगितले जाते व हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होऊन समृद्धी येते असे सांगितले जाते. याच व्रत कथेनुसार पुढे व्रत करणारा उततो-माततो व त्याला व्रताचा विसर पडतो. मग त्याच्यावर संकटे येतात. त्या संकटसमयी कुणीतरी पुन्हा व्रतकर्त्याला त्याच्या व्रताची आठवण करून व्रत करायला प्रेरित करते व परिणामी देवता त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला गेलेले सारे परत मिळते.
अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे अनंत कावळे या कर्मचाऱ्याने केलेल्या जलदेवता व्रताची. त्यांनी हे व्रत मुख्य म्हणजे
निःस्वार्थपणे केले. परिणामी जलदेवता त्यांच्यावर प्रसन्न झाली. त्यांचे व्रत त्यांना जीवनदायी फलप्राप्ती देणारे ठरले. या आगळ्या-वेगळ्या जलव्रताची कहाणी म्हणजे आजूबाजूच्या विहिरी कोरड्याठाक असताना पण अनंत कावळे यांच्या विहिरीला पाणी होते. याचे कारण त्यांच्या कूपनलिकेला जीवंत झरा होता. याशिवाय अनंत कावळेंनी त्यांच्या परिसरात पावसाळी पाण्याचे पुनर्भरण करण्याचा प्रयोग यशस्वीपणे व सातत्याने राबविल्यामुळे त्यांच्याकडील पाण्याचा स्रोत व स्तर कायम राहिलाच, शिवाय त्यातून इतरांना पण काही करण्याची प्रेरणा मिळाली हे विशेष.
पाण्यासाठी ग्रामीण भागात वणवण भटकावे लागते. जमिनीखालचे पाणी खेचून आपली गरज भागवू ही सर्वसाधारण मानसिकता असली तरी पाण्याच्या पातळीच्या संदर्भातील परिस्थिती आता पूर्णपणे बदलली आहे. पाणी असलेला भूगर्भ झपाट्याने रिता होत असून 400 फुटांपर्यंत जमिनीचे पोट चिरूनही पाण्याचा थेंब बाहेर पडण्याची नसणारी शक्यता इतरांप्रमाणेच अनंत कावळे यांच्या पण अनुभवास आली. वयाची सत्तरी पार केल्यावरही एक “जलवेडा’ तरुण म्हणून अनंत कावळे यांनी केलेले काम अनंत काळ स्मरणात राहणारे व अनेकांना अनंत काळ उपयुक्त असे ठरले आहे. आपल्या नोकरीकाळात सार्वजनिक बांधकाम विभागात आरेखक म्हणून काम करताना योगायोगाने त्यांना कार्यालयाच्या ग्रंथालयातच बसावे लागायचे. यातून त्यांना पुस्तक वाचण्याची आवड निर्माण झाली. त्यातूनच एकदा पुस्तक चाळताना त्यांच्या हाती “रेन वॉटर हार्वेस्टिंग’ हे पुस्तक लागले. यातून त्यांना या विषयाची आवड निर्माण झाली.
आपली ही आवड अनंत कावळे यांनी घर बांधताना प्रत्यक्षात अमलात आणली. त्यांच्या या प्रयोगामुळे घरातील बोअरिंगला भरपूर पाणी लागले. दरम्यान त्यांच्या घराच्या अवती-भवती असणाऱ्यांच्या घरातील विहिरींना मात्र पुरेसे पाणी नसायचे. अशावेळी गरजू 20 घरांना त्यांनी आपल्या बोअरचे पाणी पुरविले. पाण्याच्या बदल्यात लोक कावळे यांना पैसे देऊ करत, मात्र, पाण्याचे पैसे न घेण्याचा त्यांचा निर्धार त्यांनी कायम ठेवलाच शिवाय लोकांना ते देऊ इच्छिणारे पैसे संबंधितांनी आपापल्या परिसरात पावसाळी पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांना आपले ज्ञान व स्वानुभवाच्या आधारे मार्गदर्शन केले. परिणामी कधी पाण्याच्या दुर्भिक्ष्यापोटी भंडारा शहरातील एका वसाहतीतील या 20 जणांनीही त्यांचे अनुकरण करीत पावसाळी पाण्याच्या पुनर्भरणाचा अवलंब केला व या साऱ्यांचीच पाणीटंचाईतून मुक्तता झाली ती कायमची!