-अशोक सुतार
आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही “गुरूपौर्णिमा’ किंवा “व्यासपौर्णिमा’ म्हणून ओळखली जाते. गुरू हा सर्वश्रेष्ठ असतो. भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान महत्त्वाचे आहे. माणसाला जन्मतः आई सर्वप्रथम गुरू असतो. शालेय जीवनात शिक्षक हे गुरू आहेत. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विविध माणसे भेटतात, ते आपल्याला अप्रत्यक्षरीत्या मार्गदर्शन करत असतात.
थोरामोठ्यांनी लिहिलेली पुस्तके, ग्रंथ हे आपले गुरू असतात. जीवनात आलेले भले-बुरे अनुभव आपले गुरू असतात.
गुरू दत्तात्रेयांनी 24 गुरू मानले. “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ आई जेव्हा मुलाला सर्व काही शिकवत असते, तेव्हा ती जणू लहान मूल होऊन जाते. गुरू या शब्दाची मोठी महती आहे. गुरुविना ज्ञान नाही. सद्गुरूची ओळख करून देणारे आध्यात्मिक गुरू श्रेष्ठ असतात. गुरू जगाकडे सकारात्मक वृत्तीने पाहायला शिकवतात, जगण्याचा दृष्टिकोन बदलतात, योग्य मार्ग दाखवतात. आपण गुरूचे बोट धरून डोळसपणे चालले पाहिजे.
गुरू प्रसंगी कठोर शब्दांत बोलतील; परंतु यामागे शिष्याने सर्व ज्ञान प्राप्त करून उच्च ध्येय गाठावे असा त्यांचा हेतू शुद्ध असतो, सदिच्छा असते.गुरू म्हणजे जगातील व्यवहार, परमार्थ, नीतिमत्ता शिकवणारे चालते-बोलते विद्यापीठ होय. गुरूचा उपदेश मनापासून ऐकावा, त्याप्रमाणे आचरण करावे आणि आपले ध्येय गाठावे. स्वामी विवेकानंद यांनी आपले गुरू स्वामी रामकृष्ण परमहंस यांना विचारले होते की, “”तुम्ही कालिमातेची पूजा करता. मला ती भेटेल काय? मी तिच्याशी बोलू शकेन काय? नरेंद्राचे (स्वामी विवेकानंद) प्रश्न ऐकून रामकृष्ण परमहंस म्हणाले, मी जे शिकवेन, ते मनापासून आत्मसात कर. तसे आचरण कर. तुला प्रचिती आली तरच एखादी गोष्ट मान्य कर. परंतु जे काही आत्मसात करशील ते अंतर्मनातून कर. हल्ली परमहंससारखे गुरू दुर्मीळ झाले आहेत आणि स्वामी विवेकानंदसारखे शिष्यही!
मुंबई, दिल्लीसारख्या मोठ्या शहरांत आजकाल अनेक बाबा-बुवा- मातांचे प्रस्थ वाढले आहे. भक्तांना आपल्याकडे आकर्षित करून पंथ, सांप्रदाय वाढवण्याचा प्रयत्न दिसत आहे. कोणी म्हणते की, आम्ही बनवलेल्या वस्तू उदा. साबण, अगरबत्त्या इ. वापरा त्यात देवत्व आढळेल, परमात्मा तुम्हाला प्रसन्न होईल. देव भेटण्यासाठी हे दलाल, ही कर्मकांडे हवीत कशाला? आम्ही अंधविश्वास बाळगून कुणावरही अवलंबून राहतो आणि फसवले जातो. खरा परमेश्वर पैशात, कर्मकांडात की नीतिमान आचरणात आहे, हा प्रत्येकाने विचार करायला हवा.
स्वामी विवेकानंद यांच्या राष्ट्रीय, सशक्त विचारांनी अनेक क्रांतिकारक, नेते निर्माण झाले. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या नेत्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली. महात्मा गांधी म्हणतात, मी स्वामीजींचे ग्रंथ लक्षपूर्वक वाचले. त्यामुळे माझे देशावरील प्रेम आणखी वाढले.
नेताजी सुभाषचंद्र बोस आपल्या आत्मकथेत लिहितात, आधुनिक राष्ट्रीय आंदोलनाचे धर्मगुरू स्वामी विवेकानंद हेच आहेत. मी पंधरा वर्षांपेक्षाही लहान असताना स्वामी विवेकानंदांचे ग्रंथ वाचले. माझ्या अस्थी- मज्जेमध्ये एका नवजागरणाचा प्रारंभ झाला. त्यांची व्याख्याने ऐकून त्यातील उपदेश-निर्देशांचा माझ्यावर प्रचंड परिणाम झाला. ग्रंथ गुरू आहेत, हे यामुळे सिद्ध होते. गुरू आणि शिष्य हे दोघेही ज्ञानाचे व्यासंगी असावेत. खरा गुरू आपल्याला प्रकाशवाट दाखवतो.