-उत्तम पिंगळे
कालच आषाढीनिमित्त प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गेलो. त्यांची पूजा आटोपली होती व काही तरी वाचत होते. खुणेनेच त्यांनी टीपॉयवरील कागद दाखवला. मी वाचू लागलो-
आषाढी एकादशी
महापर्व खरे
लक्षावधी वारकरी येती
पायी पायी।
कळसाचे दर्शने
होती महाधन्य
मांडती ती मागणी
माऊली चरणी ।।
राज्याचे सरदार म्हणते मनोमनी युती राहावी अभेद्य धनुष्यबाणी।
माझेही शाबूत असो मुख्यमंत्रिपद त्यांच्या
जीवा नसो उगा घोर।।
गोवा कर्नाटकी
आमदारी बंड
विनवणीचे पाणी
ना करी थंड।
लोकप्रतिनिधींस
सत्ता हाव फार
लोककल्याणाचे
काम काय करी ।।
राज्याचे दुष्काळी तूच धाव घेई वरुणा तू धाडावे मराठवाडी ।
मुंबापुरी त्यास जपून पाडावा
संततधार नसावी वेळोवेळी।।
उंदरांचे ठायी थोडी बुद्धी द्यावी कालवे ना पोखरी पुण्यनगरी। खेकड्यांची आता पिरगळावी नांगी अतिरेकीवृत्ती असे धरणापायी।।
काश्मिरदेशी अमरनाथ यात्रा
सुकर ती व्हावी भक्त गणी।
अतिरेक्यांचा तेथे बुद्धिभेद व्हावा प्रवाहात भारतीय सामील होई।।
कॉलेजांचा नुसता राज्यात सुकाळ नोकरी ती युवकांस
कोठे मिळे?।
येथेच कारखाने लागू बहु
वाढू रोजगारे सर्व राहो
उभे पायी।।
मोबाइल यंत्र फोफावले आहे
युवकांशी त्याचे
व्यसनाची लागे।
धोकादायी सेल्फी काढी पाण्या संगे वाहून प्रवाही
जाती दुर्लक्षाने।।
सामान्य माणसा दगदग नसावी महागाई ती राहावी आटोक्यांत।
सरकार दरबारी कामे नीट व्हावी ना लागो द्यावे तेथे चहापाणी।।
बळीराजाला कर्ज झाले
आहे माफी
मायंदळ पीक द्यावे त्यासी।
किफायती भाव त्यांसी मिळावा
आत्महत्या विचार
जावा गळूनी।।
धरणे पूल यांची
काळजी असावी
डागडुजी असावी
समया समयी।
अपघात येते नावासी नसावे
सर्व सुरळीत राहावे
अखंड समयी।।
आषाढी समयी हेची दान द्यावे मांगल्य सारे व्हावे देशामाजी।
कार्तिकीस पुन्हा
आपल्याच ठायी
आभार प्रदर्शने येईन
पायी पायी।।
सरांचे हे कवन वाचून मनोमन वाटले की असेच सर्वत्र व्हावे व नकळत हात पांडुरंगासमोर जोडले गेले.