हिमांशू
ठरलेल्या दिनक्रमानुसार भल्या सकाळी स्मार्टफोनने आम्हाला हाक दिली. जागं होऊन अलार्म बंद केला. “प्रभाते करदर्शनम्’ हा परिपाठ गेली अनेक वर्षे चुकलेला नाही. असं म्हणतात की, ज्या हातानं आपण दिवसभर काम करणार आहोत, त्याचं दर्शन भल्या सकाळी घेतलं पाहिजे. पूर्वी हे जमत नसे. परंतु स्मार्टफोन आल्यापासून आपोआप जमू लागलं. सकाळी-सकाळी तळहात आपसूक डोळ्यांसमोर येतोच. फक्त तळहात आणि डोळे यांच्यामध्ये स्मार्टफोन असतो. तर… नेहमीप्रमाणं “करदर्शन’ करीत असताना काही मित्रांनी पाठवलेले भंपक सुविचार नेहमीप्रमाणं प्रथम समोर आले. हे मित्र की शत्रू? सकाळी-सकाळी उपदेशांचे डोस देतात. फिलॉसॉफी झोडतात; मात्र स्वतः त्यातलं काहीच अंमलात आणत नाहीत. “गेलेला पैसा नक्की परत येईल; पण गेलेला क्षण कधीच परत येणार नाही,’ हा असाच एक सुविचार वाचून लगेच डिलीट केला. जांभया देत-देत असे सर्व बिनमहत्त्वाचे मेसेज संपवले आणि मूळ मुद्द्याकडे वळलो. आपण झोपेत असताना काही महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत का, हे दाखवण्याचे आदेश स्मार्टफोनला दिले. असंख्य लिंक्स समोर आल्या. आपल्या दृष्टीनं ज्या महत्त्वाच्या घटना वाटल्या त्या लिंक एकेक करून पाहायला सुरुवात केली आणि एका लिंकवर नजर खिळून राहिली. “तुम्ही सेलफोनवर किती वेळ असता?’ असा प्रश्न त्या लिंकवर होता. सहज म्हणून लिंक क्लिक केली.
एका मोबाइल कंपनीनं “सायबर मीडिया रिसर्च’ नावाच्या संस्थेसोबत केलेल्या सर्वेक्षणाची ती बातमी होती. आपण भारतीय माणसं तासांच्या हिशोबात वर्षातले सरासरी 75 दिवस मोबाइलशी बोलत राहतो, असं बातमीत ठळकपणे म्हटलं होतं. म्हणजे…? आपण वर्षातले 75 दिवस “करदर्शन’च करत असतो की काय? मग वर्षात दिवस उरले किती? अवघ्या 295 दिवसांचं मोबाइलविरहित वर्ष… बापरे! त्यातून झोपेचे रोजचे आठ तास (म्हणजे सरासरी 121 दिवस) वजा केले, रोजचे आठ तास (सुट्या सोडून सुमारे 97 दिवस) कामाचे वजा केले (अर्थात, त्यातलेही काही तास पुन्हा स्मार्टफोनचेच!) तर 293 दिवस खर्च झालेच की! उरले 72 दिवस. त्यातल्या खाण्या-पिण्याच्या, अंघोळीच्या, व्यायामाच्या वगैरे वेळा वजा केल्या, प्रवासाचा वेळ वजा केला, तर उरलंच काय? हा अत्यल्प वेळ आपण कुटुंब, मित्रमंडळी, वाचन, टीव्ही, क्रिएटिव्हिटी वगैरे सगळ्या गोष्टींना विभागून देतो. स्मार्टफोन आल्यामुळं आपण स्मार्ट झालोय खरं; पण त्या स्मार्टनेसचा वापर करायला वेळच उरलेला नाही. काहींच्या मते, स्मार्टफोन येण्यापूर्वी आपण स्मार्ट होतो आणि आता फक्त फोनच स्मार्ट आहे. असो, या वादापासून दूर राहिलं तरी 75 दिवस आपण गमावलेत, हे खरं!
असंख्य स्मार्टफोनधारक दररोज एकतृतीयांश वेळ फोनबरोबर घालवतात. वर्षातले 18 हजार तास मोबाइलला दान करणारा यूजरही सर्वेक्षणात सापडलाय. किशोरवयापासून स्मार्टफोन वापरणारे 75 टक्के आहेत तर 41 टक्के शाळकरी मुलं स्मार्टफोन हाताळतात. विशेष म्हणजे, स्मार्टफोनच्या वापरामुळं शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचं 70 टक्के यूजर्सनी या सर्वेक्षणात मान्य केलंय; पण कळलं तरी वळायला हवं ना! आता सकाळी करदर्शनाऐवजी कर जोडून फोनदर्शन घेणंच योग्य वाटतंय.