-उत्तम पिंगळे
कालच प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गेलो…
विसरभोळे : या…कशी झाली काश्मीर ट्रिप?
मी : एकदम झकास सर, म्हणूनच तिकडून आल्याआल्या आपणास भेटावयास आलो. हा घ्या माता वैष्णो देवीचा प्रसाद.
विसरभोळे : धन्यवाद आणि हे काय केशर?
मी : होय, काहीतरी आणावयाचे म्हणून घेतले. तसे आपल्या मुंबईत काय मिळत नाही सांगा?
विसरभोळे : हो आणि मुंबईतही तेथूनच येते.
मी : प्रत्यक्ष गेलोच होतो म्हणून घेऊन आलो.
विसरभोळे : बाकी तेथील परिस्थिती कशी काय आहे?
मी : हं आहे शांत, पण कधी कुठे काय होईल ते सांगता येत नाही. पण आमचा प्रवास ठीक झाला. श्रीनगरमध्ये तर पावलोपावली सीआरपीएफचे जवान तैनात असतात.
विसरभोळे : मग हाऊस बोटवरील स्टे झालाच असेल?
मी : होय, दोन दिवस होतो. पण त्या “दाल लेकचे’ पाणी एवढे खराब झाले आहे की, काही विचारू नका.
विसरभोळे : 1989 सालानंतर अशांततेने काश्मीरचे पर्यटन ठप्प होते. ते पुन्हा 2009च्या सुमारास सुरू झाले. आता दाल लेकबाबत बोलत असाल तर 2017 च्या रिपोर्टनुसार रोज 50 दशलक्ष लिटर सांडपाणी या सरोवरात टाकले जाते व त्यातील 20 दशलक्ष लिटर काहीही प्रोसेस केलेले नसते. सुमारे बाराशेच्या वर हाऊस बोटी एकट्या डाल लेकमध्ये विखुरल्या आहेत. मध्यंतरी काश्मीर सरकारने सर्व हाऊस बोटींसाठी कॉमन सांडपाणी व्यवस्थापन निर्माण करायचे ठरवले होते. त्यास हाऊस बोट मालकांनी विरोध केला कारण त्यामुळे त्यांना त्यांच्या हाऊस बोटी सरोवराच्या एकाच बाजूस ठेवावयास लागणार होत्या. त्यामुळे तिथे गर्दी झाली असती.
मी : होय, पण मी आता पाहिले तर पाणी खूपच खराब झाले आहे. परवा शिकाराच्या सफरीवर असताना एक बिस्कीटचा पुडा आम्ही फोडला तर त्या नाविकाने कागद येथे खाली टाकू नका असे सांगितले. तो म्हणाला, साब जी ये झील हमारी आंखे है। इसको खराब मत करना।
विसरभोळे : गेल्याच वर्षी सरोवरातील झाडे तोडली गेली. कारण त्यांची पाने पडून प्रदूषण होते म्हणून. गेल्या कित्येक वर्षांतील अनधिकृत घुसखोरीने सरोवर 72 वर्ग किमी वरून 12 वर्ग किमी एवढे आक्रसले आहे. म्हणजेच सरोवर मृत होण्याच्या मार्गावर आहे.
मी : तसे झाले तर पर्यटन क्षेत्रावर खूप परिणाम होईल. कारण हाऊस बोट स्टे व शिकारा राइड हे कार्यक्रम बहुतेक सर्वच पर्यटन कंपन्यांच्या सहलींमध्ये समाविष्ट असतात.
विसरभोळे : हे पाहा आता या प्रदूषणाची जबाबदारी जो तो आपल्याकडून झटकत आहे व प्रदूषण तसेच वाढत आहेत मग नागरिक हाऊस बोटींवर, हाऊस बोटवाले नागरिकांवर व सरोवरातील मळे करणाऱ्या कृषकांवर फोडत आहेत. असे तू तू मैं मैं चालू असताना कोणताही घटक प्रदूषण थांबवण्याचा कोणताही प्रयत्न करताना दिसत नाही.
मी : मग त्या अहवालानुसार सरोवर खरोखरच मृत होईल?
विसरभोळे : साठलेल्या पाण्यातील प्रदूषणावर निसर्गसुद्धा आपल्या परीने काही उपाय करत असतो पण तुम्ही जर सतत प्रदूषित घटकच टाकणार असाल तर निसर्ग काहीच करू शकणार नाही. एकेकाळचे सौंदर्ययुक्त सरोवर हे आगामी काळात “विषारी डबके’ बनून जाण्याचाच धोका जास्त वाढलेला दिसतो.