-अमेय गुप्ते
प्रतिभावंत साहित्यिक, सिद्धहस्त लेखक, कवी, विडंबनकार, निर्भीड पत्रकार, चित्रपट निर्माते, नाटककार, व्याख्याते अशा अनेक क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवणारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा आज 50 वा स्मृतिदिन. त्यानिमित्त…
आपल्या निर्भीड लेखणीने व अमोघ वक्तृत्वाने जनमनात स्वतंत्र स्थान निर्माण करून टीकेस हजरजबाबीपणे उत्तर देणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे आचार्य अत्रे. या पुरोगामी महाराष्ट्राचे एक प्रतिभाशाली रत्न. 13 ऑगस्ट 1898 ते 13 जून 1969 असा त्यांचा 70 वर्षांचा जीवनकाळ. पुण्याजवळील सासवड, पुणे, मुंबई असा त्यांच्या प्रतिभेचा व कार्याचा जीवनप्रवास. आचार्य अत्रे कोण होते? असे विचारण्यापेक्षा ते कोण नव्हते? असे विचारणे अधिक उचित ठरेल.
14 मे 1946 रोजी प्रथम बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात दत्तो वामन पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या निर्वाचन समितीच्या बैठकीत संमेलनाचे अध्यक्ष गजानन त्र्यंबक माडखोलकर यांनी संयुक्त महाराष्ट्राचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. मुंबईत 21 ऑक्टोबर 1955 पासून “संयुक्त महाराष्ट्र परिषद’ स्थापन करून त्याद्वारे संयुक्त महाराष्ट्र निर्मितीची घोषणा करण्यात आली. यामध्ये आचार्य अत्रे अग्रभागी होते. 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर 1956 रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर भाई माधवराव बगल यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या मेळाव्यात आचार्य अत्रे, कॉम्रेड बी. टी. रणदिवे, दत्ता देशमुख, उद्धवराव पाटील, एस. एम. जोशी यांची निर्भीड भाषणे झाली.
आचार्य अत्रे आपल्या भाषणात म्हणाले, आपण जर मदत करणार असाल तर येत्या विजयादशमी पासून मी नवे दैनिक काढतो. यावर सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात अत्रेंना पसंती दर्शवली व संयुक्त महाराष्ट्राची गगनभेदी घोषणा केली.त्यावर अत्रे म्हणाले, नुसत्या टाळ्या वाजवून वर्तमानपत्र निघत नाही! त्यासाठी खिशात हात घालावे लागतात. त्यावर स्वयंसेवकांनी पेट्या फिरवल्या. एकंदर त्यावेळी सगळे मिळून 62 रुपये 12 आणे जमले. दैनिकाचे नाव “मराठा’ असावे असे सेनापती बापट यांनी सुचवले.
15 नोव्हेंबर 1956 रोजी “दैनिक मराठा’चा पहिला अंक निघाला. त्यावेळी सुमारे 25 हजार अंक संपले. साधारण पंधरा एक दिवसात मराठा दैनिकाचे नाव लोकप्रिय झाले व वाचकांच्या प्रचंड प्रतिसादाने दैनिकाने लोकप्रियतेचे शिखर गाठले.
एकदा अत्रेंचे गिरगावमधील शांतारामाची चाळ येथे जाहीर सत्कार आयोजित केला होता.त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रबोधनकार ठाकरे होते. लालजी पेंडसे, उद्धवराव पाटील, रा. म. आठवले असे दिग्गज व्यक्ते होते.
यावेळी अत्रे आपल्या भाषणात म्हणाले, गेल्या निवडणुकीत बलसाडच्या मतदारांनी मोरारजी देसाई यांना निवडून दिले, येत्या निवडणुकीत कराडचे मतदार यशवंतरावांच्या बाबतीत कराडचे बलसाड करतील अशी मला आशा आहे. अत्रेंनी संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे अनेक जाहीर सभा घेतल्या, आपल्या ओजस्वी वाणीने अनेक नेत्यांवर घणाघाती प्रहार केले. अनेक नेत्यांवर कोट्या केल्या. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दौरे केले, प्रचार सभा घेतल्या. आपल्या निर्भीड लेखणीने अग्रलेख लिहिले. पंडित नेहरूंच्या दुटप्पीपणावर कोरडे ओढले. अशा प्रकारे अत्रेंच्या भरीव योगदानामुळे मुंबई महाराष्ट्रासह विभक्त होण्यापासून वाचली.
30 एप्रिल 1960 रोजी मुंबईतील हजारो मराठी माणसे हातात मशाल घेऊन मध्यरात्री एका मोठ्या मिरवणुकीत सहभागी झाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी फ्लोरा फौंटन येथे जमली. दुसऱ्या दिवशी सकाळी शिवाजी पार्क मैदानावर लाखो मराठी लोकांसमोर पंडित नेहरूंनी महाराष्ट्र राज्याचा आणलेला मंगल कलश द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना सुपूर्द केला व मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला.
आश्चर्य म्हणजे या दिमाखदार सोहळ्याचे आमंत्रण आचार्य अत्रेंना नव्हते. ज्या अत्रेंनी आपली लीलया लेखणी चालवून निर्भीड पत्रकारिता केली, व्याख्याने दिली, नेत्यांना विडंबनाची काव्यपुष्पे वाहिली त्या आचार्य अत्रंचे या पुरोगामी महाराष्ट्राला कायम स्मरण राहील यात शंका नाही. त्यांच्या सारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही. झाले बहु होतील ही बहु परी या सम हा…