-हेमंत देसाई
भारतात औद्योगिक क्षेत्रात जी आदरणीय व्यक्तिमत्त्वे आहेत, अशांमध्ये रतन टाटा, नारायणमूर्ती प्रभृतींबरोबरच अझीम प्रेमजी यांचेही नाव घ्यावे लागेल. पुण्यातून खाद्यतेल निर्मिती क्षेत्रात प्रवेश करून, त्यांनी नंतर दक्षिण भारतात प्रवेश केला आणि देशातील द्वितीय क्रमांकाची, विप्रो ही आयटी कंपनी उभारण्यापर्यंत मजल मारली. आज तिची उलाढाल साडेआठ अब्ज डॉलर इतकी असून, एवढे कर्तृत्व गाजवल्यानंतर येत्या 30 जुलै रोजी अझीम प्रेमजी कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहेत. 31 जुलैपासून त्यांचे सुपुत्र रिशद हे सूत्रे हाती घेतील.
अनेक कंपन्यांमध्ये सत्तांतराची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली जात नाही. शिवाय संस्थापक निवृत्त होता होत नाही. अगदी प्रसारमाध्यमाच्या क्षेत्रातही वय झाल्यानंतरही खुर्ची न सोडणारी मंडळी होती व आहेत. परंतु अझीमजींनी योग्य वेळेत वारसदाराच्या हातात सूत्रे सोपवली आहेत. येत्या महिन्यात ते वयाची 74 वर्षे पूर्ण करत आहेत. खरंतर राजकारणात नव्वदी उलटली तरी आणि मार्गदर्शक मंडळात ढकलूनही लोक घरी बसायचे नाव घेत नाहीत. मात्र, विप्रो समूहाची तब्बल 53 वर्षे पायाभरणी आणि नेतृत्व करणारे अझीम याला अपवाद ठरले आहेत.
अर्थात आणखी पाच वर्षे ते कंपनीच्या बिगरकार्यकारी संचालकपदावर राहणार आहेत. गेल्या आर्थिक वर्षाअखेर प्रेमजी यांनी स्वतःकडील अतिरिक्त 52 हजार कोटी रुपयांचे समभाग अझीम प्रेमजी प्रतिष्ठान या सेवाभावी उपक्रमाला भेट म्हणून दिले आहेत. प्रतिष्ठानसाठी त्यांनी आतापर्यंत 1.40 लाख रुपये इतकी देणगी दिली आहे. प्रेमजी यांना यापूर्वी पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. लांड्यालबाड्या न करता, सचोटीने व कार्यक्षमतेने उद्योगात यश मिळवता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. माझ्या आयुष्याचा प्रवास प्रदीर्घ व समाधानकारकरीत्या पार पडला आहे. यापुढील काळात मला दातृत्वाच्या कामात अधिक लक्ष घालायचे आहे, असे उद्गार प्रेमजी यांनी काढले आहेत.
विप्रो कंपनीचे आपले 34 टक्के समभाग विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी खर्च करू पाहणारा हा माणूस वेगळाच म्हटला पाहिजे. हाशम प्रेमजी या अझीमजींच्या वडिलांनी विप्रो कंपनी स्थापन केली. अझीम यांनी सॉफ्टवेअर क्षेत्रातील उत्पादनांचा विस्तार करून त्यात विविधता आणली. 1966 साली अझीम यांनी स्टॅनफर्ड महाविद्यालयातील आपले शिक्षण अर्धवट सोडले आणि ते भारतात परतले. तेव्हा ते 21 वर्षांचे होते. पित्याचा मृत्यू झाल्यामुळे त्यांनी कंपनीची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्यांच्या कंपनीचे मूळ नाव वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स असे होते.
महाराष्ट्रात अंमळनेर येथून ती खाद्यतेलांचे उत्पादन करत होती. विप्रोचा शिकेकाई साबणही अनेकांना आजही लक्षात असेल. अझीमजींनी व्यवसायाचा विस्तार केला आणि हार्डवेअर व सॉफ्टवेअर क्षेत्रात प्रवेश केला. पुढे हार्डवेअरचा धंदा कमी झाल्यावर, त्यांनी सॉफ्टवेअर सेवांवर भर द्यायला सुरुवात केली. आज विप्रोचा सॉफ्टवेअरचा व्यवसाय 800 कोटी डॉलरवर जाऊन पोहोचला आहे. तर गृहोपयोगी वस्तू, पायाभूत अभियांत्रिक आणि वैद्यकीय उपकरणांचा व्यवसाय करणाऱ्या विप्रो एंटरप्रायझेसने 200 कोटी डॉलरचा व्यवसाय केला आहे.
विप्रो कंपनीचे 85 टक्के भागभांडवल स्वतःकडे ठेवल्याबद्दल लोक अझीमजींवर टीका करत. त्यावेळी, उद्या कोणीतरी माझ्या कंपनीत शिरकाव करून, तिच्या विकासावर विपरीत परिणाम करणे मला आवडणार नाही, असे चोख उत्तर अझीम यांनी दिले होते. जेव्हा भारतातील आयटी उद्योग वाढू लागला, तेव्हा अझीमजींनी आपल्या कर्मचाऱ्यांनाही आर्थिक प्रोत्साहन म्हणून समभाग देण्यास सुरुवात केली.
व्यवसाय-उद्योगात नीतिमत्ता जपणे महत्त्वाचे आहे, असे संस्कार त्यांनी आयटी उद्योगावर केले. त्यामुळे आज आयटी क्षेत्रात अनेक मिनी-प्रेमजी निर्माण झाले. ही स्वागतार्ह गोष्ट आहे. आपल्या कंपनीतील 34 टक्के मालकी शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या अझीम प्रेमजी प्रतिष्ठानला त्यांनी दिली आहे. खेरीज, 33 टक्के समभाग देणगीदाखल त्यांनी दिलेच आहेत. याचा अर्थ, अझीमजींकडे आता कंपनीची फक्त सात टक्के मालकी थेटपणे आणि अन्य एनटीटीजच्या माध्यमातून आहे.
विप्रोतील 67 टक्के भागभांडवलावर मिळणारा नफा हा प्रतिष्ठानला मिळणार आहे. कंपनीतील 26 टक्के भागभांडवल सर्वसामान्य जनतेकडे आहे. अझीम प्रेमजी प्रतिष्ठानतर्फे देशातील विविध राज्य सरकारांबरोबर शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्याचे काम केले जाते. एखाद्या शाळा वा महाविद्यालयास देणगी देऊन, त्या संस्थेस स्वतःचे नाव देऊन प्रसिद्धीची टामटूम करायची, अथवा चिल्लर रकमेचे सटरफटर पुरस्कार देऊन विविध क्षेत्रांत नेटवर्किंग करून घ्यायचे, हा उद्योग सध्या तेजीत आहे.
शिक्षणसम्राट तर विद्यार्थी व पालकांच्या मुंड्या पिरगाळून सक्तीच्या देणग्या उकळतात आणि त्या बळावर आपला राजकीय धंदा बरकतीला आणतात. याउलट अझीम प्रेमजी प्रतिष्ठान करते, ते कार्य मूलगामी स्वरूपाचे आहे. भारतात सरकारी शाळांचा दर्जा सुमार असून, मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही. “प्रथम’ या संस्थेने सातत्याने जे संशोधन अहवाल प्रसिद्ध केले आहेत, त्यानुसार भारतातील सातवीच्या विद्यार्थ्यांना साधे गुणाकार-भागाकार करता येत नाहीत. अथवा पाचवीच्या विद्यार्थ्यांना दोन वाक्येही धड लिहिता येत नाहीत.
अनेक शिक्षक केवळ नव्या वेतन आयोगाच्या अहवालाच्या प्रतीक्षेत असतात आणि त्यांचे ज्ञानही दिव्य असते. व्यवसाय-उद्योगासाठी लागणारी कौशल्ये अशा शाळा वा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांकडे नसतात. भारतातील बेरोजगारीचे हेदेखील एक कारण आहे. देशातील शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्याचे कार्य अझीम प्रेमजी यांनी अवश्य तडीला न्यावे, अशी आपण अपेक्षा करूया. करोडो रुपयांच्या सरकारी सवलतींचा लाभ घेऊन, पुन्हा नवनव्या मागण्या करणाऱ्या कंपन्यांनी हा कित्ता समोर ठेवूनच आपली वाटचाल करायला हवी.