-सत्यवान सुरळकर
पुण्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत एका शिक्षकाने 12 अल्पवयीन मुलींचा विनयभंग करून शिक्षकी पेशाला काळीमा फासला आहे. त्याच्या या वाईट कृत्यामुळे शिक्षक या नात्याला गालबोट लागले आहे. पालक आपले पाल्य शिक्षकांच्या भरवशावर शाळेत पाठवून निर्धास्त होतात. कारण पालकांचा शिक्षकांवर विश्वास असतो. मात्र ज्युलियस सिझरच्या खऱ्या मित्राने जेव्हा त्याच्या पाठीत खंजीर खुपसला तेव्हा आपल्याच मित्राकडून विश्वासघात झाल्याचे लक्षात आल्यावर सिझरच्या तोंडी शेवटचे वाक्य होते, “इट्स टू ब्रुट्स!’ आज त्या शिक्षकाने पालकांचा आणि विद्यार्थांचा विश्वासघात केल्यानंतर “सर, तुम्हीसुद्धा!’ असे म्हणायची वेळ आली आहे.
गुरूचे स्थान केवळ आपल्या भारतातच उच्च आहे असे नव्हे तर संपूर्ण जगात गुरूला मानसन्मान दिला जातो. मात्र काही विकृत शिक्षकांमुळे या चांगल्या पेशाला खाली मान झुकवावी लागते. संस्काराची खरी शिदोरी ही शिक्षकांमुळेच विद्यार्थांना मिळते. ती शिदोरी घेऊन विद्यार्थी भविष्यातील वाटचाल करीत असतो. शिक्षकांनी शिकवलेली मूल्ये सर्वांना पुढील आयुष्यात उपयोगी पडत असतात. विद्यार्थ्यांचे उभे आयुष्य घडवणे शिक्षकांचे काम असते. शिक्षक म्हणजे दुसरी आईच आहे.
आईच्या हाती पाळण्याची दोरी असते तर शिक्षकाच्या हाती जीवन जगण्याची दोरी असते. आई मुलांना वाढवते तर शिक्षक मुलांना घडवतो. आई मुलांच्या पोटाची भूक भागविते तर शिक्षक मुलांच्या ज्ञानाची भूक भागवितो. शिक्षकांमुळे समाजात सुसंस्कृत नागरिक घडवला जातो. गुरूचे हे स्थान कुणीही हिरावून घेऊ शकत नसल्याने ते चिरकाल अबाधित राहणार आहे. शिक्षकांकडे आजही मानसन्मानाने पाहिले जाते. शिक्षक जसा आकार देईल तसे विद्यार्थी घडवले जातील आणि अर्थातच समाजही घडेल.
पुण्यातील ही घटना काही पहिलीच घटना नव्हे. या अगोदरही कितीतरी घटनांमध्ये काही नराधमांकडून कोवळ्या जीवांचे लचके तोडलेले दिसतील. या घटना कालही घडत हात्या, आजही घडत आहेत, पुढेही…? या घटना कधीही थांबणाऱ्या नाहीत का? शिक्षकांमधील “गुरू’ नेहमी जिवंत राहिला पाहिजे. काम, क्रोध, धन या लोभांपासून शिक्षक लांब राहिला पाहिजे. यातील एकही अवगुण शिक्षकात शिरला तरी त्याच्या हातून एक पूर्ण पिढी उद्ध्वस्त होऊ शकते.
शिक्षक हा प्रांजळ मनाचा असावा. तो वासनाधिन नसावा. दासबोध या ग्रंथात समर्थ रामदास म्हणतात,
वासनानदीमाहापुरीं । प्राणी बुडतां ग्लांती करी ।
तेथें उडी घालून तारी । तो सद्गुरु जाणावा ।।
वासनेच्या महापुरात जे वाहून गेले आहेत त्यांना किनाऱ्यावर आणण्याचे काम गुरू करतो, असे रामदास स्वामींनी म्हटले आहे. शिक्षकांचे काम इतरांना वाईटापासून परावृत्त करायचे आहे. मात्र, काही शिक्षकच वासनेत वाहून जात आहेत. ढोंगी, लबाड, कपटी व्यक्तींनी शिक्षकी पेशात येऊच नये. अशा वाईट प्रवृत्तीच्या शिक्षकांमुळे ज्ञानाची ज्योत फडफडतेय. ती केव्हा विझेल हे काही सांगता येणार नाही. सध्याची परिस्थिती पाहता शिक्षकांनाही समुपदेशनाची गरज निर्माण झाली आहे. शिक्षक-विद्यार्थी हे पवित्र नाते टिकले तरच समाज टिकणार यात काही शंका नाही. शिक्षकीपेशा हा पूर्णपणे निर्मळ असणे काळाची गरज आहे.