-ज्योती सरदेसाई
“अपराजिता’ हे आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सामाजिक कर्तृत्वाची संघर्ष यात्रा सांगणारे, अंजली कुलकर्णी यांनी लिहिलेले पुस्तक वाचनात आले आणि मी या पुस्तकाच्या प्रेमातच पडले. अतिशय साध्या सोप्या भाषेत अंजली कुलकर्णींनी नीलम गोऱ्हेंचे कर्तृत्व दाखवून दिले आहे. मनोगतात लेखिका म्हणतात, त्यांची आणि नीलमताईंची भेट युक्रांदच्या संघटनेत झाली. तेव्हापासूनच नीलमताईंचा धीटपणा, आत्मविश्वास, बौद्धिक चमक पाहून त्यांच्याविषयी उत्सुकता, आदर वाटून हे बहुआयामी कार्य लोकांसमोर यावे यामुळे पुस्तक लिहिण्यास घेतले.
सुरुवातीस नीलमताई सामाजिक कार्याकडे कशा वळल्या तो प्रसंग दिला आहे. नीलमताई दहा-बारा वर्षांच्या असताना एक नवरा बायकोला मारहाण करीत आहे आणि इतर नुसते बघत आहेत, असे त्यांनी पाहिले. हा प्रसंग त्यांच्या मनावर कोरला गेला. शाळेतच नीलमताईंच्या मनात समाजवादी विचारांची बिजे रुजली. वडीलही उदारमतवादी विचारांचे होते.
आईची माया, आजोळचे भक्तिमय वातावरण व भरपूर पुस्तके अशा अनेक गोष्टींनी नीलमताई घडत गेल्या. शालेय वयातच नीलमताईंनी अनाथ आश्रमात काम करण्यास सुरुवात केली. पुढे कॉलेजला असताना आधी आदिवासी भागात काम केले नंतर युक्रांदमध्ये प्रवेश केला. युक्रांदच्या शिबिरातही त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केली. महिलांच्या प्रश्नांवर काम करण्याची सुरुवातही येथेच झाली.
पहिल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनीच एका विधवेचे केशवपन होणार होते, ते कार्यकर्त्यांनी थोपविले. येथे नीलमताईंना आपल्या कामाचा पहिला धडा मिळाला. महिलांच्या प्रश्नांवर काम करताना नीलमताईंना जाणवले की अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव, गरिबी यामुळे स्त्रियांची अवस्था बिकट आहे. यावर अनेक सभा घेऊन त्यांचे अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न केला. नीलमताईंनी महिलांमध्ये प्रबोधन, रचनात्मक कार्य आणि संघर्ष हीच आपल्या कामाची त्रिसूत्री ठरवली.
नीलमताई बीजिंग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेस गेल्या होत्या. तेथे 189 देशांतून महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. त्यांच्याशी चर्चा करून अनेक नवीन विचार घेऊन आल्या आणि येथे तशा यंत्रणा राबविल्या. त्यानंतरही त्या सातत्याने युनोच्या स्त्री विभागाशी निगडित राहिल्या. या पुस्तकातून 80 च्या दशकापासूनचे समाजाचे स्त्री-प्रश्नांबद्दलचे एक चित्र स्पष्ट उभे राहते. त्या अर्थाने हे पुस्तक म्हणजे एक सामाजिक दस्तऐवजच तयार झाला आहे.
आपल्या कारकिर्दीत नीलमताईंनी आपल्या ध्येयावरचा विश्वास ढळू दिला नाही. आपल्या अभ्यासात, कृतीशीलतेत कधी कमी पडल्या नाहीत हे सर्व वाचकांच्या मनांवर बिंबवण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. एखाद्या चांगल्या चित्रपटाप्रमाणे घटना प्रसंगांतून मजकूर असा सरकत जातो ठेवावेसे वाटत नाही.