-उत्तम पिंगळे
विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही, वेताळाला खांद्यावर घेऊन चालू लागला. वेताळ म्हणाला, राजा मी काय म्हणतो ते नीट ऐक. फक्त तू मध्ये बोलणार नाहीस. जर तू मध्येच बोललास तर मी पुन्हा झाडावर निघून जाईन.
वेताळ सांगू लागला- नुकतेच मध्य प्रदेशातील वजनदार नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला. म्हटलं तर बातमी मोठी कारण शिंदे राजघराणे आहे. त्यांचे वडील कॉंग्रेसचे मोठे नेते होते तसेच यांच्या वडिलांच्या मातोश्री कायम जनसंघ व भाजपाशी निगडीत होत्या. त्यांच्या भगिनी राजस्थानच्या मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत. आता अशा राजघराण्याने तडकाफडकी कॉंग्रेसला रामराम ठोकला यातून काय निष्कर्ष काढायचा ते समजत नाही. अलीकडे वर्षानुवर्षे निष्ठावान राहणारेही पक्ष सोडू लागले आहेत. एकूणच अशा निष्ठावान नेत्यांची पक्षांशी निष्ठा आता राहत नाही की काय? हा प्रश्न पडतो. का अलिकडे निष्ठावंतांना जाणून बुजून डावलून नवे येणाऱ्या उपऱ्यांना पदे दिली जाताहेत हे प्रकार वाढताहेत असे वाटते. पूर्वी तिकीट जरी मिळाले नाही तरी अशी बंडखोरी सहसा होत नसे. का आता पक्ष नेतृत्वाचा पक्षावर वचक राहिलेला नाही? हाही प्रश्न पडतो. आता कोणी निष्ठावान, कधी कोणता पक्ष कशासाठी सोडेल तेच सांगता येत नाही. याबाबत विक्रमा तुला काय वाटते?
मग विक्रम सांगू लागला, हे वेताळा आजकाल सत्ता व पैसा याला खूपच महत्त्व आलेले आहे. सत्ता आली की पैसा मिळतो व पैसा असेल तर सत्ताही आणता येते, असे समीकरण झालेले आहे. त्यामुळे जो तो सत्तेचा भुकेला आहे. तशी घराणेशाही तर बहुतेक सर्व पक्षांत आहे. मी नाही तर माझा मुलगा वा मुलगी, सून किंवा जावई यांना तिकीट मिळावे यासाठी सगळ्यांची केविलवाणी धडपड चालू असते. नवे जुने वाद तर सर्वच पक्षांत आहे. जुने संयमी नेते आता कमी होत चालले आहेत व नवीन युवकांस नवे काहीतरी करण्यासाठी सत्ता ही हवीच आहे. त्यामुळेच “जिसकी लाठी उसीकी भैंस’ हे समीकरण चालू आहे. पक्षतत्त्व वगैरे राहिले बाजूला. सामान्य नेत्यांचे सोडा पण वर्षानुवर्षे पाण्यात पाहणारे पक्षही एकत्र येऊ लागले आहेत. उलट अशामुळे सामान्य मतदार व कार्यकर्ते यांच्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. कधी कधी अगदी स्थानिक निवडणुकीत जोरात प्रचार चालू असतानाच त्यांच्या नेत्यांनी पक्ष बदलला म्हणून चांगलीच गडबड होते.
एकूणच सर्वत्र बांधिलकी आता तत्त्वपक्ष अशी राहिली नसून सत्ता व पैसा या समीकरणाभोवती फिरताना दिसते. तसेच याला कोणताही पक्ष अपवाद नाही. कमी अधिक प्रमाणात सर्वच पक्षांत हे चालू आहे. कित्येक वेळा काही सीनिअर्स आपणहून बाजूला जातात किंवा त्यांना हळूहळू खड्यासारखे बाजूला केले जाते. पक्षांतर करून आलेल्यांना पदे दिली जातात याचे कारण एकच की त्यांना चांगला पाठिंबा असतो, त्यांची निवडून येण्याची शक्यता जास्त असते. सामान्य लोकांनाही ते अंगवळणी पडलेले असून “तळे राखी तो पाणी चाखी’ असे तेही मान्य करतात. शेवटी काय कालाय तस्मै नम:
विक्रमाचे उत्तर ऐकून वेताळ म्हणाला, हे राजा तू म्हणतोस ते मला पटले. पण राजा तू बोललास त्यामुळे हा मी निघालो, असे म्हणून वेताळ प्रेतासह पुन्हा पिंपळाच्या झाडावर जाऊन लोंबकळू लागला.