उत्तम पिंगळे
विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही, वेताळाला खांद्यावर घेऊन चालू लागला. वेताळ म्हणाला, राजा मी काय म्हणतो ते नीट ऐक, फक्त तू मध्ये बोलणार नाहीस. जर तू मध्येच बोललास तर मी पुन्हा झाडावर पळून जाईल.
वेताळ म्हणाला, “हे विक्रमा, जगभर करोना नामक विषाणूने धूमाकूळ घातला आहे. भारतवर्षांच्या बाबतीत बोलायचे झाले तर मार्चपासून लॉकडाऊनचा प्रकार सुरू केला गेला आणि आता हळूहळू सैल केला जात आहे. मात्र काही राज्यात जसे पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील काही भागांत पुन्हा लॉकडाऊन सुरू केले आहे. देशाची आर्थिक व्यवस्था पार कोलमडून गेलेली आहे.
सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प आहे. विविध आस्थापने व कारखाने यांच्यामध्ये अत्यल्प उपस्थिती असून उत्पादन किती ठिकाणी कमी प्रमाणात चालू आहे तर छोटे मोठे उद्योग सध्या बंद आहेत. शिक्षण संस्था बंद आहेत. पर्यटन पूर्णपणे ठप्प असल्यामुळे त्यावर असलेले वाहतूक व हॉटेल्स मंदीत गेलेली आहेत. क्रीडा विश्व, सिनेसृष्टी यातील असंख्य रोजगार थांबले आहेत. चित्रपटगृहे, मॉल्स ओसाड पडलेच आहेत. लग्नसोहळा तसेच कित्येक सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम होत नसल्यामुळे बाजारपेठा ठप्प आहेत.
कपडा व्यवसाय, वाहन व्यवसाय यात कुणी खरेदीदार नाही. आता रोगी वाढत असताना काही भागात लॉकडाऊन कमी आणि काही भागात पुन्हा लॉकडाऊन सुरू केले आहे, याला काय अर्थ आहे?’
वेताळाचे एवढे बोलणे संपल्यावर विक्रम म्हणाला, हे वेताळा तू जे काही सर्व सांगितले आहेस ते केवळ भारत वर्षास लागू नसून पूर्ण जगात लागू आहे. तुला माहीत आहे की, भारतवर्षासारख्या खंडप्राय देशामध्ये पूर्णपणे लॉकडाऊन किती अवघड आहे.
पहिल्या लॉकडाऊनमुळे करोनाची लोकांना नीट माहिती झाली व ते हळूहळू काळजी घ्यावयास लागू लागले. पुढे रोग पसरतच गेल्यामुळे लॉकडाऊन शिवाय पर्याय नव्हता. आता लोकांना चांगली माहिती झाली आहे तसेच बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे त्यामुळे मंदीतून बाहेर पडावयास हवेच नाहीतर देशाचा गाडा कसा पुढे जाणार? आता आवश्यक असणारे मास्क व सॅनिटायझर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेले आहेत.
आवश्यक काळजी घेऊन हळूहळू अर्थव्यवस्था पूर्व पदावर आणणे आवश्यक आहे. जगभर या विषाणूवर औषधं व लसीचे प्रयोग सुरू आहेत. लोकांनाही समजून चुकले आहे की करोना असा अचानक जाणार नसून तो आपल्या बरोबरच राहणार आहे. एकदा हा उपाय निघाला की इतर जसे रोग आहेत उदा., मलेरिया किंवा इतर कोणती व्हायरल इनफेक्शन्स त्याप्रमाणेच करोना हा सर्वसाधारण रोग राहील.
आपण त्या दिशेने जात असून ते होत असतानाच आपला गाडाही लवकरात लवकर सुरळीत होण्याकरता हा हळूहळू अनलॉक चालू आहे. तर ज्या भागात रुग्णसंख्या वाढतच आहे तेथे पुन्हा लॉकडाऊन सुरू केले आहे.
विक्रमाचे उत्तर ऐकून वेताळ म्हणाला, हे राजा तू म्हणतोस तेच खरे सत्य आहे, हे मला पटले. पण राजा तू बोललास त्यामुळे हा मी निघालो, असे म्हणून वेताळ प्रेतासह पुन्हा पिंपळाच्या झाडावर जाऊन लोंबकळू लागला.