-हिमांशू
पबजी गेम बंद झाला आणि अनेक योद्ध्यांचा अचानक शक्तिपात झाला. इकडे टेलिकॉम कंपन्यांना ऍडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू म्हणजे एजीआरची थकित रक्कम भरायला दहा वर्षांची मुदत मिळाली आणि तिकडे भारताने चीनवर दुसरा डिजिटल स्ट्राइक केला. म्हणजे, आता सगळ्या कंपन्या स्वस्त डेटाचे प्लॅन घेऊन येणार (काहींनी आणलेसुद्धा) आणि अनेकांना नेमका त्यांचा लाडका गेमच खेळता येणार नाही.
आता कुणी म्हणेल, की संपूर्ण जग एका महासंसर्गाचा मुकाबला करीत असताना मोबाइल, डेटा प्लॅन, ऍप्स वगैरे विषयावर बोलण्यात काय हशील! परंतु “एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो…’ या धर्तीवर “एक जीबी डेटा की किमत तुम क्या जानो…’ असं म्हणणाऱ्यांनाच या विषयाचं “गांभीर्य’ समजेल. “जग लहान झालं हो…’ असा नारा बुलंद झाला तेव्हा कोविडचं आगमन झालेलं नव्हतं; पण जग खरोखर किती लहान झालंय, हे मात्र कोविड काळातच कळून चुकलं.
मोबाइलच्या रूपानं जग तळहातावर सामावलं आणि त्या जगात राहणाऱ्यांची तहानभूक हरपली. सातत्यानं आजूबाजूला फिरणाऱ्या रुग्णवाहिकांचा आवाजही हळूहळू ऐकू येईनासा झाला. एवढंच काय, अनेकांना स्वतःची नोकरी गेल्याचाही धक्का बसला नाही किंवा खूप उशिरा आणि हळूवार बसला. आपल्याला या महिन्याला कमी पगार मिळालाय, हेही मोबाइलवरून डिजिटल व्यवहार करतानाच बऱ्याच जणांच्या लक्षात आलं.
आम्हाला अखंडितपणे “डेटामृत’ पाजणाऱ्या दूरसंचार क्षेत्रात एक सरकारी कंपनीही आहे आणि तिने आता 20 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतलाय. 30 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कंपनीनं यापूर्वीच काढून टाकलंय. आता ज्या 20 हजार लोकांना नारळ दिला जाणार, त्यांना गेल्या वर्षभरात पगारच मिळालेला नाही. त्यामुळे 13 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचं कर्मचारी संघटना सांगते.
विशेष म्हणजे, कायम कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केल्यानंतर या कंपनीतून 79 हजार कर्मचारी बाहेर पडलेत. कायम कर्मचारी पूर्वी जी कामं करीत होते, ती आता कंत्राटी कर्मचारी करतात. आता त्यांनाही नारळ दिल्यावर कंपनी चालवणार कोण, असा प्रश्न वास्तविक पडायला हवा. परंतु कंपनी आमच्यासाठी स्वस्त डेटाचा प्लॅन आणणार की नाही, हा एवढा महत्त्वाचा प्रश्न आहे की त्यापुढं कंपनी राहते की जाते, हा प्रश्न कस्पटासमान आहे. ज्या कंपन्या जगतील, तगतील त्या आम्हाला डेटा देत राहतील. ज्या गाशा गुंडाळतील, त्या कंपन्यांशी देणंघेणं असायचा सवालच नाही. दूरसंचार क्षेत्रातल्याच कंपन्यांविषयी आम्हाला एवढी “आस्था’ असल्यामुळे इतर क्षेत्रांचं, कंपन्यांचं, कर्मचाऱ्यांचं काय होतंय, याचं टेन्शन ऐन कोविड काळात आम्ही का घ्यायचं?
एका गोष्टीचं टेन्शन मात्र घेतलंच पाहिजे. एखादा विषाणू जर एवढ्या मोठ्या संख्येनं माणसं मारू शकतो, तर तसाच एखादा विषाणू आमच्या मोबाइलमध्ये शिरला तर…? साबणानं वारंवार तळहात धुताना नेहमी हीच धास्ती असते. कारण संसर्गजन्य मालवेअर मोबाइलमध्ये सोडणारी काही ऍप सापडलीत. यातलं एखादं ऍप आपण डाउनलोड केलं असतं तर…? आपण जी ऍप डाउनलोड केलीत ती तरी सेफ असतील का? या प्रश्नांमागची धास्ती आणि तगमग केवळ मोबाइलमित्रांनाच कळू शकते.