78 लाख रूपये खर्च करणार
पुणे – शालेय शिक्षण विभागाच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमाअंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांसाठी महा आयटीकडून तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी 78 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
ई-गव्हर्नन्स अंतर्गत पुण्यातील एनआयसीमध्ये सद्यस्थितीला प्रकल्पांची कामे सुरू आहेत. नवी दिल्ली येथील एनआयसीएसआय या संस्थेमार्फत तांत्रिक मनुष्यबळ यापुढे प्रकल्पासाठी उपलब्ध होणार नाहीत. यामुळे महा आयटीमार्फत मनुष्यबळ घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी शिक्षण आयुक्तांनी शासनाकडे प्रस्तावही सादर केला होता. त्यास 14 मार्च 2019 च्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
1 एप्रिल ते 31 मार्च 2020 या कालावधीत माहिती तंत्रज्ञान मंडळाकडून मनुष्यबळ पुरवठ्याची कार्यपद्धतीही निश्चित करण्यात आली होती. याअंतर्गत 23 प्रोग्रॅमरच्या सेवा पुढीत काळातही सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठीचा खर्च सन 2019-20 च्या पंचवार्षिक योजनेच्या लेखाशिर्षाच्या तरतूदीतून भागविण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण आयुक्तांना नियंत्रक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातील लेखा विभागाच्या सहायक संचालकांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे कार्यासन अधिकारी प्रवीण मुंढे यांनी काढले आहेत.