कुरकुंभ – केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने अहमदनगर ते बारामती महामार्गाचे काम हाती घेण्यात आले असून हा प्रस्तावित महामार्ग दौंड तालुक्यातील गोपाळवाडी, लिंगाळी, कुरकुंभ, जिरेगाव हद्दीतून जातो. या मार्गावरील कुरकुंभ-जिरेगाव हद्दीत हा रस्ता बऱ्याच महिन्यापासून खोदलेल्या अवस्थेत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी ठेकेदाराकडून कोणतीही ठोस उपाय योजना केलेली नाही. रात्रीच्या वेळी हे खोदकाम दिसण्यासाठी लाल रंगाचे चमकनारे फलक लावणे गरजेचे बनले आहे, मात्र याठिकाणी कोणतीही अपघाताविषयी खबरदारी घेतली गेली नसल्याने या स्त्यावरील खोदकामामुळे रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महामार्गाचे काम सुरू असतानाच कुरकुंभ-जिरेगाव येथील शेतकऱ्यांनी याला विरोध दर्शविला होता. मोबदला द्या मगच काम सुरू करा, असा पवित्रा घेतला होती; मात्र संबंधित ठेकेदाराने ते काम सुरू ठेवून खोदकामास सुरुवात केली. हा रस्ता खोदून ठेवला. अखेर या कामास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविल्याने हे काम बंद केले गेले. मात्र चार महीने उलटून देखील हा रस्ता खोदलेल्या अवस्थेत तसाच आहे. त्यामुळे येथून प्रवास करताना प्रवाशांना धुळीचा सामना करावा लागत आहे. याचा नाहक त्रास दुचाकीस्वारांना होत असल्याचे चित्र आहे. बऱ्याच दिवसांपासून हा रस्ता खोदून ठेवल्यामुळे येथील वाहतुकीवर याचा परिणाम झालेला दिसून येत आहे. एकदम मध्येच हा रस्ता खोदला असल्याने अंधाराच्या वेळी हा खड्डा दिसून न आल्याने मोठे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नगर-बारामती महामार्गावर जिरेगाव हद्दीत तीन ते चार महिन्यापासून रस्ता खोदलेल्या अवस्थेत आहे. रस्त्याचे अर्धवट काम अपघातास निमंत्रण देणारे ठरत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने शासनाने योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर रस्ता पूर्ण करावा.
– भरत खोमणे, सरपंच जिरेगाव